९० कंटेनर घेऊन निघालेली मालगाडी झाली बेपत्ता! रेल्वे प्रशासनात खळबळ, १३ दिवसांनी अशी पोहोचली मुंबईत

146

नागपूरवरून मुंबईकडे जाणारी मालगाडी काही काळ बेपत्ता झाल्याने रेल्वे प्रशासनात एकच खळबळ उडाली होती. १ फेब्रुवारी रोजी ही मालगाडी जवळपास ९० कंटेनर घेऊन मुंबईला निघाली. ही मालगाडी ४ ते ५ दिवसात जेएनपीटी बंदरामध्ये पोहोचणे अपेक्षित होते परंतु १३ दिवस झाले तरीही ही गाडी जेएनपीटी बंदरात पोहचली नसल्याने चौकशी करण्यात आली.

( हेही वाचा : यंदाच्या मोसमी पावसावर ‘एल निनो’चे सावट; वातावरण बदलामुळे धोका वाढणार)

भारतीय रेल्वेच्या पीजेजेटी (१०४०२०१) या क्रमांकाच्या मालगाडीमध्ये ९० कंटेनर होते. या सगळ्या कंटेनरमध्ये तांदूळ, कागद, प्लास्टिकच्या वस्तू, केमिकल्स आणि इतर निर्यात करण्याच्या वस्तू होत्या. परंतु एका ठराविक अंतरावर आल्यानंतर या मालगाडीचे लोकेशन अचानक अदृश्य झाले होते. एफओआयएस ही रेल्वे डब्यांना लाइव्ह मॉनिटर करण्याची भारतीय रेल्वेची यंत्रणा आहे. परंतु लोकेशन सुद्धा अदृश्य असल्याने यंत्रणाही कामाला लागल्या. नागपूरच्या मिहान इनलॅंड डेपोमधून ही मालगाडी १ फेब्रुवारीला निघाली होती.

नेमके घडले काय?

नागपूरवरून ही गाडी निघाल्यावर भुसावळ डिव्हिजनला ५ फेब्रुवारीला पोहोचली आणि तांत्रिक कारणामुळे मध्य रेल्वेच्या भुसावळ डिव्हिजनमध्ये ही गाडी शेगावजवळ थांबवण्यात आल्याची माहिती आता जेएनपीटीला देण्यात आली आहे असे रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी स्पष्ट केले आहे. भुसावळ डिव्हिजनमध्ये गाडी वेळेत पोहोचली फक्त रेल्वेच्या सिस्टिममध्ये याचे लोकेशन येत नसल्यामुळे हा घोळ झाल्याचे रेल्वेच्यावतीने सांगण्यात येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.