मुसळधार पावसात माजी नगरसेवक जनतेच्या सेवेत…

79

मुंबईत मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळून अनेक भागांमध्ये पाणी तुंबण्याचे प्रकार घडले. महापालिकेने शंभर टक्के नालेसफाईचे दावे केले आणि यंदा पाणी तुंबणार नाही याची यासाठी मिनि पंपिंगसह इतर पर्जन्य जलवाहिनी टाकण्याचे काम केल्यांनतरही काही प्रमाणात पाणी तुंबलेले पहायला मिळाले. अनेक ठिकाणी सोसायटी, घरांमध्ये पाणी शिरले गेले आणि त्यामुळे लोकांची त्रेधातिरपीट उडाली. त्यामुळे निवडणुका लांबणीवर पडल्याने माजी नगरसेवकांचे फोन पुन्हा खणखणू लागले आणि पुन्हा एकदा माजी नगरसेवकांनी भर पाण्यात उतरत लोकांच्या घरांमध्ये शिरलेल्या पाण्याला अधिकाऱ्यांना हाताशी धरून बाहेरची वाट करून देण्याचा प्रयत्न केला.

निचरा न होणाऱ्या पाण्याची पाहणी 

मागील सोमवारपासून मुंबईत सलगत तीन दिवस मुसळधार पावसाची बरसात होत आहे. मंगळवारी माटुंगा पूर्व येथील वच्छराज लेन येथे पाणी तुंबले होते. या तुंबणाऱ्या पाण्याचा निचरा होत नसल्याने अखेर स्थानिक माजी नगरसेविका राजेश्री शिरवडकर यांनी दक्षिण मध्य विभागाचे भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश शिरवडकर यांनी पाहणी केली. या पाहणीदरम्यान रेल्वे मार्गावर सोडलेला पंप योग्यप्रकारे सोडला नसल्याने हा प्रकार घडत असल्याचे निदर्शनास आले. यावेळी राजेश्री शिरवडकर आणि त्याचे पती राजेश शिरवडकर यांनी चक्क रेल्वेच्या संरक्षक भिंतीवर चढून निचरा न होणाऱ्या पाण्याची पाहणी केली. त्यानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांन याची कल्पना देत पंप योग्यप्रकारे बसवण्याच्या सूचना त्यांनी केल्यावर येथील पाण्याचा निचरा होऊ लागला.

तर मुलुंड पश्चिम येथील जे एन रोड गाला रोड परिसरात पाणी साचल्याने स्थानिक माजी नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांनी प्रत्यक्ष त्याठिकाणी टी विभागाचे सहायक आयुक्त चक्रपाणी अल्ले आणि महापालिकेचे अधिकारी आदींसह पाहणी करून पाण्याचा निचरा करण्याच्या सूचना केल्या.

bmc

तर मानखुर्द परिसरात मंगळवारी पाणी तुंबल्याने स्थानिक माजी नगरसेविका वैशाली शेवाळे यांनी भर पाण्यात अधिकारी कर्मचाऱ्यांसह उतरत पाण्याच्या निचरा करण्यासाठी प्रयत्न केला. तर वांद्रे-खार भागातील नवीन लिंकींग रोड खार २४ रोड येथे पाणी तुंबल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक माजी नगरसेविका स्वप्ना म्हात्रे स्वत: रस्त्यांवर उतरत अधिकाऱ्यांच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी योग्य त्या सूचना केल्या, त्यानंतर या भागातील पाणी ओसरले आणि नागरिकांना दिलासा मिळाला. तर सोमवारपासून कांजूर गाव येथील परिसरात मुसळधार पावसामुळे सखल भागात पावसाचे पाणी साचल्याने यासर्व जागांना भेटी देऊन स्थानिक माजी नगरसेविका सारीका पवार यांनी अधिकाऱ्यांना त्वरीत योग्य त्या उपाययोजना राबवण्याचे निर्देश दिले. तर कांदिवली परिसरातही पोयसर नदीचे पाणी संरक्षक भिंतीच्या पलिकडे जात गृहनिर्माण सोसायटींमध्ये शिरल्याने स्थानिक माजी नगरसेविका प्रतिभा गिरकर यांनी त्या भागांमध्ये स्वत: उपस्थित राहत कर्मचाऱ्यांकडून पाण्याचा निचरा करण्यासाठी उपाययोजना करुन घेतली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.