मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी केली पूरग्रस्त गडचिरोली जिल्ह्याची पाहणी

89

गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर हा वाढलेला आहे. सातत्याने होणा-या पावसाचा विदर्भातील गडचिरोली जिल्ह्याला मोठा फटका बसला आहे. मुसळधार पावसामुळे गडचिरोलीत नदी व नाल्यांना पूर आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यातील याच पूरपरिस्थितीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली. यावेळी कोणालाही मदत कमी पडणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.

मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी

अतिवृष्टीमुळे कुठल्याही भागात मदतीचा पुरवठा कमी प्रमाणात होता कामा नये. कुठेही मालमत्ता आणि जीवितहानी होणार नाही, तसेच गडचिरोलीतील काही नागरिकांचे स्थलांतर करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी अधिका-यांना दिल्या आहेत. राज्यातील इतर भागांतील अतिवृष्टीच्या बाबतही विशेष लक्ष देण्याचे आदेश यावेळी एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

उपाययोजनांची घेतली माहिती

गडचिरोलीतील आरमोरी तालुक्यातून वाहणा-या वैनगंगा नदीच्या पुलावरुन मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूरपरिस्थितीची पाहणी केली. यावेळी गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संजय मीना आणि पोलिस अधीक्षक अंकित गोयल उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पाणीपातळी आणि जिल्हा प्रशासनाने केलेल्या विविध उपाययोजनांची माहिती घेतली.

जिल्ह्याला रेड अलर्ट

11 आणि 12 जुलै दरम्यान हवामान विभागाने गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला आहे. सातत्याने पडणा-या पावसामुळे जिल्ह्यातील नदीनाल्यांच्या पातळीत वाढ झाली आहे. विदर्भातील वैनगंगा, प्राणहिता आणि वर्धा नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.