शेतकऱ्यांना आठवड्याभरात मदत जाहीर करणार; मुख्यमंत्र्यांची ग्वाही

90

अहमदनगरच्या पारनेर तालुक्यातील वनकुटे गावात ९ एप्रिल रोजी वादळी वारा, गारपीटीसह ढगफुटीसदृश पावसाने झालेल्या नुकसानीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी पाहणी केली. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधताना, सरकार तुमच्या पाठीशी ठामपणे उभे असून पंचनामे पूर्ण झाल्यावर आठवड्याभरात तुम्हाला मदत दिली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिली.

( हेही वाचा : ‘एकनाथ शिंदेंना उडवणार’, मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी देणारा पोलिसांच्या ताब्यात )

अहमदनगर जिल्ह्यात झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसामुळे अनेक भागांना मोठा फटका बसला आहे. यातील पारनेर तालुक्यातील वनकुटे गावाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी भेट दिली. या गावातील हिरामण बन्सी बर्डे, कचरू विठ्ठल वाघ यांच्या घरांची या पावसात मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. या पडझड झालेल्या घरांची पाहणी करून मुख्यमंत्र्यांनी या गरीब शेतकऱ्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी पडझड झालेल्या घरांची तात्पुरत्या स्वरूपात तात्काळ उभारणी‌ करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. तसेच वनकुटे मधील पडझड झालेल्या‌ २२ कुटुंबाना तात्काळ शबरी घरकुल योजनेमधून घरकुल घरे उपलब्ध करून देण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

अवकाळी पावसाने या गावातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कांदा, कलिंगड, टोमॅटो, उन्हाळी भुईमूग या पिकांसह मका, कडवळ, घास ही चारा पिके जमीनदोस्त झाली आहेत. झालेल्या नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर करावेत असेही त्यांनी यावेळी जिल्हा प्रशासनाला सांगितले.

यावेळी भेटीनंतर शेतकरी बांधवांशी संवाद साधताना, झालेल्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ पूर्ण करून घ्यावे. ते प्राप्त झाल्यानंतर आठवडाभरात तुम्हाला झालेल्या नुकसानीची भरपाई देऊ असे सांगून शिंदे यांनी त्यांना आशवस्त केले. त्यासोबतच नुकसानग्रस्त शेतकरी कुटुंबाला यावेळी 10 किलो गहू व तांदळाचे प्रातिनिधिक स्वरूपात वाटपही करण्यात आले.

याप्रसंगी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार डॉ.सुजय विखे पाटील, खासदार सदाशिवराव लोखंडे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, शिवसेना प्रवक्ते संजीव भोर, शिवसेना भाजपा चे स्थानिक पदाधिकारी आणि जिल्हा प्रशासनातील सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी

कोणत्याही परिस्थितीत सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीशी असून या नैसर्गिक आपत्तीवेळी त्यांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही. यापूर्वी देखील झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना १७७ कोटींची मदत कालच जाहीर केली असून आजवर सर्वाधिक म्हणजे १००० कोटींचे वाटप शेतकऱ्यांना करण्यात आले असल्याचे देखील यावेळी बोलताना सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.