मध्य रेल्वे सुरक्षा दलाने गेल्या वर्षात ८६ व्यक्तींचा वाचवला जीव

105

रेल्वे सुरक्षा दल (RPF) कर्मचारी रेल्वेच्या मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी नेहमीच आघाडीवर असतात आणि चोवीस तास जागरुक राहतात. तसेच कर्तव्यावर असलेल्या इतर रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मदतीने रेल्वे प्रवाशांचे प्राणही वाचवतात.

“मिशन जीवन रक्षक”चा एक भाग म्हणून मध्य रेल्वेच्या आरपीएफ जवानांनी आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये मध्य रेल्वेत आतापर्यंत ८६ लोकांचे प्राण वाचवले आहेत. काही वेळा स्वतःचा जीवही धोक्यात घातला. या जीव वाचवणाऱ्या घटनांचे काही व्हिज्युअल्स प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये खूप लोकप्रिय झाले आहेत आणि सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

या ८६ घटनांपैकी एकट्या मुंबई विभागात ३३ व्यक्तींचा जीव वाचवण्याच्या घटनांची नोंद झाली आहे. नागपूर विभागात १७ व्यक्तींचा जीव वाचवण्याच्या घटनांची, पुणे विभागात १३ व्यक्तींचा जीव वाचवण्याच्या घटनांची, भुसावळ विभागात १७ व्यक्तींचा जीव वाचवण्याच्या घटनांची आणि सोलापूर विभागात ६ व्यक्तींचा जीव वाचवण्याच्या घटनांची नोंद झाली आहे.

रेल्वे सुरक्षा दलाच्या या जवानांना प्रवासी आणि रेल्वे मालमत्तेवरील गुन्हे, अतिरेकी हिंसाचार, ट्रेनच्या वाहतुकीतील अडथळा, हरवलेल्या मुलांची सुटका तसेच ट्रेन आणि रेल्वे परिसरात अंमली पदार्थ जप्त करणे, प्रवाशांचे सामान परत मिळवणे इत्यादी विविध सुरक्षा आव्हानांचा सामना करावा लागतो. ते प्रवाशांच्या सुरक्षेवर बारीक लक्ष ठेवतात.

आरपीएफच्या सतर्कतेने बहुतेक प्रकरणांमध्ये अशा प्रवाशांचे प्राण वाचवले आहेत, जे काहीवेळा निष्काळजीपणा करतात आणि धावत्या ट्रेनमध्ये चढताना किंवा उतरताना धोक्याचा सामना करतात. काही वेळा विविध वैयक्तिक कारणांमुळे आत्महत्येचा प्रयत्न करताना जीव वाचवण्यात आला आहे. पण शेवटी, जीव वाचवणाऱ्यांच्या या कृतीचा परिणाम आनंददायक, सुखकारक आणि आरपीएफ जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा असतो.

मध्य रेल्वेने प्रवाशांना धावत्या ट्रेनमधून चढून किंवा उतरून आपला जीव धोक्यात घालू नये, असे आवाहन केले आहे. कृपया ट्रेन सुटण्याच्या वेळेआधीच स्टेशनवर पोहोचावे.

(हेही वाचा – सिंधुदुर्गला अवकाळीचा तडाखा; कोकणातील आंबा, काजू, जांभूळ धोक्यात)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.