Drugs In Raigad : रायगडच्या समुद्रकिनाऱ्यांवर अमली पदार्थांची २०० पाकिटे सापडली; पाकिस्तान कनेक्शन असण्याची शक्यता

119
Drugs In Raigad : रायगडच्या समुद्रकिनाऱ्यांवर अमली पदार्थांची २०० पाकिटे सापडली; पाकिस्तान कनेक्शन असण्याची शक्यता
Drugs In Raigad : रायगडच्या समुद्रकिनाऱ्यांवर अमली पदार्थांची २०० पाकिटे सापडली; पाकिस्तान कनेक्शन असण्याची शक्यता

गेल्या पंधरा दिवसांत रायगडच्या समुद्र किनाऱ्यावर अमली पदार्थांची २०० हून अधिक पाकिटे वाहून आली. (Drugs In Raigad) २०९ किलो वजनाची १७५ चरसची पाकिटे जिल्ह्यातील विविध किनाऱ्यांवर वाहून आली आहेत. त्यांची बाजारातील किंमत सुमारे ८ कोटी ३६ लाख रुपये आहे. याबरोबर जीवना बंदर येथे ९ पाकिटे, मारळ बीचवर ३०, सर्वे बीचवर २४, कोंडीवली बीचवर २८, दिवेआगर, आदगाव बीचवर ४६, कोर्लई आणि थेरोंडा बीचवर १९, आक्षी बीचवर ६, नानीवली बीचवर १, श्रीवर्धन बीचवर १२ पाकिटे जप्त करण्यात आली  आहेत. पोलिसांनी मोहीम राबवत ही पाकिटे जप्त केली. मोठ्या प्रमाणात एकाच जिल्ह्यात एकाच पद्धतीने होत असलेली ही अमली पदार्थाची तस्करी उघड झाल्याने हा एका मोठ्या षडयंत्राचा भाग आहे का, याचा पोलीस तपास करत आहेत.

(हेही पहा – NDA : लोकसभा निवडणुकीत एनडीएमध्ये मोठा पक्ष सहभागी होणार; कर्नाटकात बदलणार गणित)

या पाकिटांवर ‘पाकिस्तान प्रिमियम क्वालिटी राईस’ असा उल्लेख आढळत आहे. त्यामुळे अफगाणिस्तानमधून पाकिस्तान मार्गे हे अमली पदार्थ आले असल्याची शक्यता नाकारता येत नाही. (Drugs In Raigad) सुरक्षा यंत्रणांच्या भितीने अथवा जाणीवपूर्वक मुंबई लगतच्या किनाऱ्यांवर ही पाकिटे समुद्रात टाकली गेली असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. मुंबई लगतच्या परिसरात तरुण पिढीला व्यसनाधीन करण्याचा उद्देश यामागे असू शकतो. त्यामुळे या घटनांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. गेल्या पंधरा दिवसांत रायगडच्या विविध समुद्र किनाऱ्यांवर अमली पदार्थांची पाकिटे वाहून येण्याचे सत्र सुरू आहे. श्रीवर्धन पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, ही पाकिटे कुठून आणि कशी आली, कोणी टाकली, हे अद्यापही स्पष्ट होऊ शकलेले नाही.

१९९२ च्या मुंबईतील बॉम्ब स्फोटांसाठी लागणारी स्फोटके ही रायगड जिल्ह्यातील दिघी आणि शेखाडी येथे उतरवली गेली होती. नंतर अजमल कसाबने केलेल्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी हल्लेखोरांनी सागरी मार्गाचा अवलंब केला होता. यानंतर कोकण किनारपट्टीवर सागरी पोलीस ठाण्यांची निर्मिती करण्यात आली होती. पण तरीही किनाऱ्यांवरील सागरी सुरक्षा कवच भक्कम झाल्याचे दिसून येत नाही. नौसेना, तटरक्षक दल आणि सागरी पोलिसांचा डोळा चुकवत अमली पदार्थ किनाऱ्यापर्यंत कसे पोहोचले, ते कोणी टाकले, असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.

सागरी पोलीस ठाण्यांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत ! – सोमनाथ घार्गे

समुद्र किनाऱ्यावर अमली पदार्थ वाहून येण्याच्या घटना लक्षात घेऊन, जिल्ह्यातील सागरी पोलीस ठाण्यांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. गस्त वाढविण्याचे निर्देशही दिले आहेत. श्रीवर्धन पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे. – सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक. (Drugs In Raigad)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.