पावसाळ्यात 'या' भाज्या खाणे टाळा

पावसाळ्यात आपल्याला गरम, चमचमीत खायला आवडत असलं, तरी काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं असतं. हवेतील दमटपणामुळे आणि पाण्यातील अशुद्धतेमुळे बरेच संसर्गजन्य आजार पसरतात. त्यामुळे कोणताही पदार्थ खाताना विशेष काळजी घ्यावी लागते. त्यामध्ये विशेषकरून पालेभाज्या अन् फळभाज्या खाताना.

पालेभाज्या खाऊ नका पावसाळ्यातील ओलाव्यामुळे हिरव्या पालेभाज्यांमध्ये जंतू वाढण्याचा धोका असतो. सामान्य दिवसांमध्ये, हे जंतू कडक सूर्यप्रकाशात मरतात किंवा निष्क्रिय होतात; परंतु पावसाळ्यात ते अधिक सक्रिय असतात.

वांगी वांगी पावसाळ्याच्या दिवसांत वांग्यांमध्ये किडे होण्याची शक्यता असल्याने या काळात वांगी खाणे टाळावे. या काळात वांगी खाल्ल्याने खाज सुटणे, त्वचेवर चट्टे उठणे, पोटातील संसर्ग अशा प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात.

फ्लॉवर पावसाळ्यात कोबी, फ्लॉवर, ब्रोकोली, ब्रसेल्स स्प्राउट यांसारख्या भाज्या खाणंसुद्धा टाळायला हवं. जास्त दमटपणामुळे विषाणू झपाट्यानं वाढतात. तसंच या भाज्यांची स्वच्छता नीट केली जाऊ शकत नाही. त्यामुळे त्या दूषित होतात.

कच्च्या भाज्या खाणं टाळा पावसाळ्यात कच्च्या भाज्यांऐवजी वाफवलेल्या किंवा उकडलेल्या भाज्या खाणं फायदेशीर ठरेल. कारण कच्च्या भाज्यांमध्ये बॅक्टेरिया आणि विषाणू असतात, ज्यामुळे पोटाची समस्या होऊ शकते.

मशरूम मशरूम ओलसर जमिनीत वाढतात आणि त्यात बॅक्टेरियाची वाढ होऊ शकते. ज्यामुळे एकदा खाल्ल्यानंतर संसर्गाचा धोका वाढतो, विशेषतः पावसाळ्यात. त्यामुळे पावसाळ्यात मशरूमला नाही म्हणलेलेच बरे.

टोमॅटो खाताना काळजी घ्या पावसाळ्यात टोमॅटो खाताना काळजी घेणे गरजेचे आहे. कारण हवेतील जास्त आर्द्रतेमुळे टोमॅटोला लवकर बुरशी लागते. बुरशीजन्य संसर्गाचा धोकाही जास्त असतो. त्याच्या सेवनाने कफदोष वाढू शकतो. त्यामुळे जर टोमॅटो खायचेच झाले तर, टोमॅटो चांगले धुऊन खावेत. शक्य असेल, तर कीटकनाशकांचा प्रभाव दूर ठेवण्यासाठी ऑरगॅनिक पद्धतीने पिकवलेल्या टोमॅटोचा वापर करावा.