Heavy Rain : पाणी तुंबण्याचे आणखी एक नवीन ठिकाण; का तुंबले भांडुपला पाणी, जाणून घ्या

1115
Heavy Rain : पाणी तुंबण्याचे आणखी एक नवीन ठिकाण; का तुंबले भांडुपला पाणी, जाणून घ्या

रविवार मध्य रात्रीपासून कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे सोमवार पहाटेपासून जनजीवनच विस्कळीत झाले. मात्र, अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे सर्व मुंबईचा अनेक भाग जलमय झाल्याचे पहायला मिळाले. या तुंबलेल्या ठिकाणांमध्ये आणखी एका ठिकाणची वाढ झाली आहे ते म्हणजे भांडुप रेल्वे स्थानक. एरव्ही घाटकोपर, कुर्ला, शीव, माटुंगा, मस्जीद बंदर आदी भागांमध्ये तुंबणाऱ्या पाण्यांच्या तुलनेत यंदा भांडुप रेल्वे स्थानकात प्रथमच पाणी तुंबले. त्यामुळे भांडुप रेल्वे स्थानकाच्या परिसरात तुंबणाऱ्या पाण्याची कारण मिमांसा शोधण्याचा प्रयत्न सुर असला तरी उषा नगर नाल्याची योग्यप्रकारे न झालेली सफाई आणि रेल्वे हद्दीतून या नाल्याला मिळणाऱ्या कल्व्हर्टची न झालेली सफाई हेच याला कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. (Heavy Rain)

मुंबईतील नालेसफाईचे काम यंदा चोख झाल्याचा दावा केल्यानंतरही पहिल्याच मुसळधार पावसात वरुण राजाने महापालिकेचे बिंगच फोडले. मुंबईतील नालेसफाईचे काम कागदावर टक्केवारी योग्यप्रकारे झाले असले तरी प्रत्यक्षात छोटे आणि मोठे नाले तसेच रस्त्यालगतचे नाले हे योग्यप्रकारे सफाई झालेले नाही. त्यामुळे मुंबईत पावसाळ्यापूर्वीची नियोजित नालेसफाईचे काम शंभर टक्के पूर्ण झाल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात मोठ्या पावसात काही सखल भागात पाणी तुंबण्याची शक्यता वर्तवली जात होती, ती रविवारी मध्यरात्रीपासून कोसळणाऱ्या पावसाने खरी करून दाखवली आहे. अनेक भागांमध्ये मोठ्या आणि छोट्या नाल्यांची सफाई, तसेच पर्जन्य जलवाहिन्यांची सुधारणा तसेच नव्याने वाहिन्या टाकण्याची कामे तसेच सहा मोठ्या पंपिंग स्टेशनसह मिनी पंपिंग स्टेशनची उभारणी केल्यानंतरही तुंबणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी वापरात येणाऱ्या पंपांची संख्या कमी होण्या ऐवजी उलट ही संख्या वाढवण्यात आली आहे. मागील वर्षी ३८० पंप लावण्यात आले होते, परंतु यावर्षी तब्बल ४८१ पंप लावण्यात आले आहेत. (Heavy Rain)

(हेही वाचा – रत्नागिरीत हिंदूंचा एल्गार; गोवंश हत्या करणाऱ्या धर्मांधाला अटक करण्याच्या मागणीसाठी हजारो Hindu रस्त्यावर)

मात्र, सर्व प्रकारच्या उपाययोजना करूनही यंदा ४८१ पंप लावल्यानंतरही मुंबईतील अनेक भागांमध्ये रविवारी मध्य रात्रीपासून पाणी तुंबण्यास जमा झाले आणि विविध भागांमध्ये तुंबलेल्या पाण्यामुळे मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे मार्ग विस्कळीत झाली. यामध्ये विशेषत: यंदा कधीही न तुंबणाऱ्या भांडुप रेल्वे स्थानकाच्या परिसरात पाणी साचले गेले होते. रेल्वे स्थानकात रेल्वे रुळांवरच पाणी जमा झाल्याने याचा परिणाम रेल्वे सेवांवर झाला. मात्र, भांडुप रेल्वे स्थानकांत तुंबलेल्या पाण्याला उषा नगर नाल्याची न झालेली सफाईच कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. उषा नगर नाला दरवेळी साफ केला जात असला तरी यंदा मात्र याची सफाई न झाल्याची तक्रारमाजी नगरसेविका सारीका पवार यांनी महापालिका प्रशासनाकडे करत हा प्रकार प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला होता. परंतु त्यानंतरही याची सफाई झालेली नाही,असे त्यांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे या नाल्याला जोडणारे तीन रेल्वे कल्व्हर्ट आहेत. यांची सफाई योग्यप्रकारे करून न घेतल्याने हा प्रकार घडला असावा असे बोलले जात आहे. (Heavy Rain)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.