Independence Day Speech : स्वातंत्र्य दिनाविषयी भाषण कसे सुरु कराल?

117

“कवी हा जन्मावाच लागतो, तो घडवता येत नाही, पण वक्ता मात्र घडवता येऊ शकतो”. चिंतन, मनन, वाचन, श्रवण, निरीक्षण याच्या बळावर वक्तृत्व कला आत्मसात करता येऊ शकते. जो जिभेला जिंकेल तो जग जिंकेल असा म्हणतात ते काही खोटे नाही. भाषण कला हि हजारो लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवते. सुविचार, उच्चार, आचार, प्रचार हे प्रभावी वक्ता होण्यासाठी आधारस्तंभ आहेत, त्यामुळेच तर वक्त्यांची ख्याती सर्वदूर पोहोचत असते. वक्त्याला त्याच्या चेहऱ्यावरून नाही तर त्याच्या विचारावरून, आवाजावरून, आणि बोलण्याच्या कौशल्यावरूनच ओळखले जाते. राजकारणी असो कि शिक्षक असो, आपले विचार सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा भाषण हा सर्वोत्तम मार्ग आहे.

कार्यालये, शाळा आणि महाविद्यालयांत स्वातंत्र्य दिन सोहळ्याची जंगी तयारी सुरू आहे. १५ ऑगस्टच्या आपल्या बालपणीच्याही काही आठवणी असतील. जेव्हा आपण विविध स्वातंत्र्य सैनिकांच्या वेशभूषा करून शाळेत जात होतो किंवा १५ ऑगस्टच्या भाषणाची तयारी करत होतो. ते दिवस आपल्याला विसरता येणार नाहीत. आजही आपण ज्या ठिकाणी शिक्षण घेतो, तेथे १५ ऑगस्टचे भाषणही दिले जात असेलच. अनेकांना माईकसमोर येऊन बोलायला भीती वाटते. १५ ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिन ही अशांसाठी एक नामी संधी असते. (Independence Day Speech)

(हेही वाचा Waqf Board Bill : वक्फ बोर्ड विधेयकावर उबाठाकडून मुस्लिमांचे लांगूलचालन!)

जर तुम्ही शाळेत शिक्षक असाल तर १५ ऑगस्टचे भाषण आपल्यासाठी खूपच महत्त्वाचे आहे. अन्य ठिकाणीही १५ ऑगस्टचे भाषण देण्याची परंपरा असतेच असते. अनेकांना माइकसमोर येऊन बोलायला भीती वाटते पण लक्षात ठेवा, आपले विचार इतरांसमोर मांडण्याची याहून चांगली संधी कामाच्या ठिकाणी पुन्हा कधीही मिळणार नाही. सर्वात आधी मनातील भीती दूर करून आपण भाषण करू शकतो हा आत्मविश्वास मनात रुजवणे अत्यंत गरजेचे आहे. भाषणाची सुरुवात कशी करावी? चांगली सुरुवात करण्यासाठी काय करावे? सुरुवातीला काय बोलावे? कोणती गोष्ट सांगावी? स्वतःची ओळख करावी का? असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. अशा वेळेस नक्की काय करावे? भाषणाची तयारी नक्की कशी करावी ते आपण पाहुयात.

जेव्हा स्वातंत्र्याविषयी आपण बोलतो तेव्हा कर्तव्याविषयीही बोलणे गरजेचे आहे. आपल्या भाषणातून सभोवतालच्या लोकांना उद्देशून सांगा की, अनेकदा ते कशाप्रकारे बेजबाबदारपणे वागतात. त्यांना सांगा की, छोट्या-छोट्या प्रयत्नांनी ते राष्ट्रनिर्मितीत आपले योगदान कसे देऊ शकतात. उदा. वाहतुकीचे नियम पाळणे, आसपासचा परिसर स्वच्छ ठेवणे, इतरांची मदत करणे यासारख्या गोष्टींचे महत्त्व लोकांना पटवून द्या. आपल्याकडे सांगण्यासारख्या अनेक गोष्टी असतील तर आपले भाषण एकदा लिहून काढा आणि नंतर बोला पण आपलं म्हणणं आटोपशीर आणि मोजक्याच शब्दांत मांडा. अनेकजण आपलं भाषण पाठांतर करून मांडण्याचा प्रयत्न करतात. अशातच जेव्हा हे पाठांतर केलेले मुद्दे विसरतात तेव्हा निराश होतात. ध्यानात ठेवा, आपला हेतु हा लोकांपर्यंत आपले विचार पोहचविणे हा आहे, ही फक्त औपचारिकता नको. अशातच त्यांच्याशी बोलताना नेहमीप्रमाणेच सामान्यपणे बोला. आपले म्हणणं पाठांतर केल्यासारखं मांडू नका. आपलं भाषण अधिक श्रवणीय होण्यासाठी म्हणी आणि छोटे-छोटे किस्से सांगा. चांगली शायरी किंवा कवितेचा आपल्या भाषणात समावेश करा.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.