मुलुंडमध्ये BJP ला करावी लागणार खांदेपालट?

214
मुलुंडमध्ये BJP ला करावी लागणार खांदेपालट?

उत्तर पूर्व अर्थात ईशान्य मुंबईतील मुलुंड विधानसभेत यंदा भाजपाला (BJP) खांदेपालट करण्याची वेळ येणार असून मराठी विरुद्ध अमराठी मुद्द्याचा परिणाम लोकसभेच्या निवडणुकीत दिसून आल्याने येणाऱ्या निवडणुकीत विद्यमान आमदाराला नारळ देऊन मराठी चेहऱ्याला संधी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुलुंडमधील आमदार मिलिंद कोटेचा यांना बाजूला करुन या मतदार संघात मराठी चेहरा दिला जावा अशी मागणी आता मतदारांकडून केला जात असून भाजपाकडेच अशाप्रकारचा अहवाल प्राप्त झाल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपा काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष आहे

मुलुंड विधानसभा मतदारसंघात सन १९९९ पासून २०१४ पर्यंत सलग चार वेळा आमदार म्हणून निवडून येणाऱ्या भाजपाचे (BJP) सरदार तारासिंग यांना वयोमानानुसार उमेदवारी न देता त्यांच्याऐवजी सन २०१९ मध्ये मिहिर कोटेचा यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामध्ये मिहिर कोटेचा या ८७, २५७ मते मिळवून विजयी झाले. परंतु नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मिहिर कोटेचा यांना उत्तर पूर्व अर्थात ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली. या निवडणुकीत मिहिर कोटेचा यांना ४ लाख १९ हजार मते मिळाली, तर उबाठा शिवसेनेचे संजय पाटील यांना ४ लाख ४६ हजार मते मिळाली. त्यामुळे भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या मतदार संघात उबाठा शिवसेनेचे संजय पाटील हे विजयी झाले.

(हेही वाचा – ‘महाभारत’ धर्मग्रंथाचे अश्लाघ्य विडंबन असलेल्या ‘संगीत वस्त्रहरण’ नाटकावर बंदी आणा; Hindu Janjagruti Samiti ची मागणी)

मुलुंड विधानसभा मतदारसंघात उमेदवाराची निवड करण्याचे आव्हान

परंतु या मुलुंड विधानसभा मतदारसंघात कोटेचा यांना १ लाख १६ हजार मते तर संजय पाटील यांना ५५ हजा ९७९ मते मिळाली होती. त्यामुळे कोटेचा यांना स्वत:च्या विधानसभा मतदारसंघात निम्म्यापेक्षा अधिक मताधिक्य घेतले असले तरी प्रत्यक्षात काही मराठी मतदारांनी भाजपाला मतदान न केल्याची माहिती समोर येत आहे. मुलुंड मतदारसंघात निवडणुकीपूर्वीच मराठी व अमराठी मुद्द्याची चर्चा होती आणि त्यातच अमराठी उमेदवार दिल्याने मराठी उमेदवारांनी भाजपाच्या उमेदवाराकडे पाठ फिरवल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे भाजपाला (BJP)  आता या मतदारसंघात मराठी उमेदवार दिल्याशिवाय पर्याय नाही. या मतदारसंघात जैन, गुजरातीसह इतर समाजाचे लोक बरेच असून भाजपाने या समाजाशी बांधिलकी असलेल्या आणि सलोख्याचे संबंध असलेल्या उमेदवाराला संधी दिल्यास भाजपाला आपला आमदार निवडून आणण्यात यश मिळेल. अन्यथा ईशान्य मुंबई लोकसभेचे नाक असलेल्या मुलुंड विधानसभेत भाजपाला अपयश येण्याची भीती वर्तवली जात आहे.

भाजपाला आता निवडून येणाऱ्या एकाही मतदारसंघाला गमावायचे नसून जो निवडून येईल आणि ज्याची क्षमता आहे त्यालाच उमेदवारी द्यावी लागणार आहे. त्यामुळे भाजपा (BJP) आता मुलुंडमध्ये कोटेचा यांना कायम ठेवते की खांदेपालट करून मराठी चेहरा देते याकडे सर्वांचे लक्ष आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत कोटेचा यांनी भाजपाच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांवर विश्वास दर्शवला नाही, त्यांना विश्वासात घेतले नाही, त्यामुळेच भाजपाला ही जागा गमवावी लागली. त्यामुळेच कोटेचा यांना उमेदवारी देण्यास भाजपात अंतर्गत विरोध वाढू लागल्याने आता भाजपासमोर या मतदारसंघात उमेदवाराची निवड करण्याचे आव्हान उभे राहिले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.