CM Eknath Shinde: आता ‘लाडका शेतकरी’ योजना आणणार

117
CM Eknath Shinde: आता 'लाडका शेतकरी' योजना आणणार
CM Eknath Shinde: आता 'लाडका शेतकरी' योजना आणणार

आगामी निवडणुकींच्या पार्श्वभुमीवर महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) आणली. राज्यात या योजनेची मोठी चर्चा सुरु आहे. या लाडकी बहीण योजनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपही सुरु आहेत. अशातच बीडमध्ये राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कृषी महोत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मोठी घोषणा केली आहे. “लाडकी बहीण योजनेनंतर आता लाडका शेतकरी योजना राबवणार” अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

लाडका शेतकरी योजना राबवणार
“महायुती सरकारचं काम म्हणजे शेतकऱ्यांच्या पिकाला थेट मार्केट उपलब्ध करुन देणं. आमच्याकडे पॅकेट नाही तर शेतकऱ्यांना थेट मार्केट देण्याचं काम आहे. कष्टकरी, वारकरी आणि सुखी शेतकरी हेच आमच्या सरकारचं धोरण आहे. मी आज एवढंच सांगतो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली. त्यानंतर अन्नपूर्णा योजना आणली. त्यानंतर लाडका भाऊ योजना आणली. आता आम्ही लाडका शेतकरी योजना राबवणार आहोत. सर्व भाऊ लाडके झाले, सर्व बहीणी लाडक्या झाल्या, आता शेतकरही लाडका होणार.” (CM Eknath Shinde)

शेतकऱ्यांच्या शेतीपंपाची वीज बिल माफ
“पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडेही आम्ही मागणी करणार आहोत की, आमच्या शेतकऱ्यांच्या पिकाला सोयाबीन आणि कापसाला चांगला भाव मिळाला पाहिजे. शेतकऱ्यांचंही कल्याण झालं पाहिजे. आज आपण सोयाबीनला ५ हजार रुपये हेक्टरी आणि कापसालाही ५ हजार रुपये हेक्टरी देण्याचा निर्णय घेत आहोत. ही मर्यादा २ हेक्टरपर्यंत असणार आहे. आता आपण ते ई-पीक पाहणी वैगेरे बाजूला ठेवणार आहोत. ज्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यांवर सोयाबीन आणि कापसाची नोंद आहे. त्या शेतकऱ्यांना आपण ५ हजार रुपये हेक्टरी पैसे देण्याचा निर्णय घेत आहोत. एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या शेती पंपाचे वीज बिलही माफ करत आहोत. विरोधक म्हणाले की, मग मागच्या वीज बिलाचं काय? आम्ही शेतकऱ्यांचं येणारं वीज बिल घेत नाही तर मग थकलेलं कसं घेणार? मागेल त्याला शेततळं आणि मागेल त्याला सोलर, अशा अनेक योजना सरकारने सुरु केल्या आहेत.” असंही मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले. (CM Eknath Shinde)

‘ही’ योजना कायमस्वरूपी सुरु राहणार
यावेळी रिमोटद्वारे नमो शेतकरी महासन्मान योजनेचा चौथा हप्ता राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटीद्वारे जमा करण्यात आला. तसेच सोयाबीन,कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पाच हजार रुपये अनुदान वितरीत करण्यासाठी वेबपोर्टलही कार्यान्वित करण्यात आले. शेतकऱ्यांना केवळ १ रुपया विमा हप्ता भरून प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ देणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य असून साडेसात अश्वशक्तीपर्यंतच्या कृषिपंपांना मोफत वीज देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ‘कष्टकरी,वारकरी आणि सुखी शेतकरी’ हेच शासनाचे धोरण असून राज्यातील कांदा, सोयाबीन, कापूस आणि दुधाला योग्य मिळवून देण्यासाठी केंद्र आणि राज्य शासन प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. माझी लाडकी बहीण योजनेमुळे महिलांच्या सक्षमीकरणामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळणार असून ही योजना कायमस्वरूपी सुरु राहणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. (CM Eknath Shinde)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.