Viswanathan Anand : बुद्धिबळ ऑलिम्पियाड जिंकणाऱ्या युवा खेळाडूंवर असा आहे विशी आनंदचा प्रभाव

Viswanathan Anand : भारताच्या पुरुष आणि महिला संघांनी ४८ वर्षांत पहिल्यांदा बुद्धिबळ ऑलिम्पियाड जिंकण्याची किमया केली.

38
Viswanathan Anand : बुद्धिबळ ऑलिम्पियाड जिंकणाऱ्या युवा खेळाडूंवर असा आहे विशी आनंदचा प्रभाव
  • ऋजुता लुकतुके

हंगेरीत सुरू असलेल्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड (Chess Olympiad) स्पर्धेत खुल्या गटात आणि महिला गटात भारतीय संघाने इतिहास रचला आहे. भारताच्या दोन्ही संघांनी प्रतिस्पर्ध्यांवर तब्बल एका गुणाने आघाडी राखत दोन सुवर्ण जिंकली. विशेष म्हणजे भारताचे दोन्ही संघ युवा होते. प्रग्यानंद, डी गुकेश, अर्जुन एरिगसी आणि विदिथ गुजराती या संघाचं सरासरी वयत २० वर्षांचं आहे. अशा युवा संघाची जेव्हा निवड झाली तेव्हा अनेकांनी भुवया उंचवल्या होत्या. विश्वनाथन आनंद (Viswanathan Anand) इतकी महत्त्वाची स्पर्धा का खेळत नाहीए, असा प्रश्न विचारला होता. पण, खेळाडूंबरोबर आनंद नसला तरी त्याचा मोठा प्रभाव त्यांच्यावर होता. आनंद संघ निवडीनंतर पहिला खेळाडू होता, ज्याने सुवर्ण पदकाचं भाकीत केलेलं होतं.

‘मला सुवर्ण पदकाचा वास येत आहे,’ असे आनंदचे शब्द होते. पुरुष आणि महिला अशा दोन्ही संघांवर त्याचा विश्वास होता. हरिका द्रोणवल्ली, आर वैशाली, दिव्या देशमुख, वंतिका अगरवाल आणि तानिया सचदेव या खेळाडूंकडूनही आनंदला विजयाचीच आशा होती. ‘या आधीचं बुद्धिबळ ऑलिम्पियाड (Chess Olympiad) चेन्नईत झालं, तेव्हाच मी या तरुण खेळाडूंना खेळताना पाहिलं, तेव्हाच मला आपण सुवर्णाच्या जवळ आहोत, याची जाणीव झाली होती. म्हणूनच मी जातीने हंगेरीला हजर राहिलो,’ असं विश्वनाथन आनंद पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाला.

(हेही वाचा – Siddhivinayak Prasad : ‘तो’ व्हिडिओ मंदिर परिसरातील नाही; सदा सरवणकर यांचे स्पष्टीकरण)

मुलांनी मिळवलेल्या यशाने आनंद सुखावला 

हा युवा संघ आणि विश्वनाथन आनंद (Viswanathan Anand) यांचे एकमेकांशी चांगले संबंध आहेत. गुकेश आणि प्रग्यानंद आता अनुक्रमे १७ आणि १८ वर्षांचे आहेत. त्यांनी अनेकदा या खेळाची प्रेरणा आनंदकडूनच मिळाल्याचं सांगितलं आहे. आताही आनंदने स्पर्धेच्या ठिकाणी हजर राहून खेळाडूंशी वारंवार संवाद साधला आणि त्याचा परिणाम खेळावरही दिसून आला. खरंतर गुकेश आणि प्रग्यानंदबरोबर आनंद मागची काही वर्षं काम करतोय. जे भारतीय खेळाडू वयाच्या १४ वर्षांच्या आत ग्रँडमास्टर जाले त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम आनंदने तेव्हाच सुरू केलं होतं. त्यामुळे गुकेश आणि प्रग्यानंद तर इतकी वर्षं आनंदच्या पंखांखालीच होते. तर अर्जुन एरिगसीचा फॉर्म बघून आनंदने त्यालाही मार्गदर्शन सुरू केलं आणि हे तीनही खेळाडू सध्या भारताचे नवीन पिढीचे शिलेदार आहेत. १८ व्या वर्षी गुकेशने जगज्जेत्या डिंग लिरेनला आव्हान दिलंय. प्रग्यानंद भारताचा वयाने सर्वात लहान ग्रँडमास्टर बनला. आता अर्जुन एरिगसीने बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये (Chess Olympiad) अपराजित राहून स्वत:ला सिद्ध केलं आहे.

आनंदची (Viswanathan Anand) या खेळाडूंना घडवण्यामागची भूमिका पाहता, फिडे या जागतिक बुद्धिबळ संघटनेनं ‘भारतीय बुद्धिबळ यशाचा जनक,’ असं आनंदला संबोधलं आहे. तर माजी जगज्जेता गॅरी कास्परोव्हने या तीन मुलांना ‘विशी आनंदची मुलं,’ असंच म्हटलं आहे. मुलांनी मिळवलेल्या यशाने आनंद नक्कीच सुखावला आहे. पण, यशाचं सर्व श्रेय तो घेत नाही. ‘मी त्यांच्याबरोबर काम करायला सुरुवात केली कारण, आपल्याकडे चांगले खेळाडू तयार होत होते. पण, ते पहिल्या शंभरात जात नव्हते. ज्युनिअर गटापासून ते मोठ्या गटापर्यंत त्यांचा प्रवास हवा तसा होत नव्हता. अशा खेळाडूंना जागतिक स्तरावर मदत करावी यासाठी मी त्यांना मार्गदर्शन सुरू केलं,’ असं आनंद पीटीआयशी बोलताना म्हणाला. पण, या तरुणांनी आनंदला यश दिलं हे नक्की.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.