Assembly Elections : मार्चच्या परीक्षेत नापास, ऑक्टोबरमध्ये पुन्हा संधी; विधानसभेसोबत नांदेड लोकसभेचा धुराळा

79
Assembly Elections : मार्चच्या परीक्षेत नापास, ऑक्टोबरमध्ये पुन्हा संधी; विधानसभेसोबत नांदेड लोकसभेचा धुराळा
  • प्रतिनिधी

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची (Assembly Elections) घोषणा मंगळवारी केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांनी केली. विधानसभेसोबतच त्यांनी दोन लोकसभा पोटनिवडणुकांचीही घोषणा केली. मराठवाड्यातील नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर विधानसभेसोबतच २० नोव्हेंबरला लोकसभेचीही निवडणूक होणार आहे. तत्कालीन काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी लोकसभेआधी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतरही वसंतराव चव्हाणांनी काँग्रेसचा गड आबाधित राखला होता, याची राज्यभर चर्चा झाली होती. आता पुन्हा एकदा काँग्रेससमोर नांदेड लोकसभेचा बालेकिल्ला राखण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. तसेच आव्हान अशोक चव्हाण यांच्यासमोर देखील आहे. मागच्या परीक्षेत नापास झालेले ऑक्टोबर मध्ये परीक्षा देऊ शकतात असाच काहीसा चान्स अशोक चव्हाण यांच्यासमोर आला आहे यासाठी त्यांची सत्वपरीक्षा होणार आहे.

लोकसभेआधी भाजपामध्ये प्रवेश करीत राज्यसभेची खासदारकी पदरात पाडून घेणाऱ्या अशोक चव्हाण यांच्यावर नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीची मोठी जबाबदारी पडणार आहे. दिवंगत वसंत चव्हाण यांच्यानंतर त्यांच्या चिरंजीवाला या पोटनिवडणुकीत काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याचे सांगितले जात आहे. लोकसभेत पराभूत झालेले प्रताप पाटील चिखलीकर पुन्हा एकदा निवडणूक लढण्यासाठी सज्ज आहेत. त्यांनी त्यांची दावेदारी आधीच पक्षश्रेष्ठींकडे व्यक्त केली आहे. तर काँग्रेसमध्येही अनेक इच्छुक आहेत, मात्र काँग्रेस हायकमांडने वसंतराव चव्हाण यांचे पुत्र रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी देण्याचे निश्चित केल्याचे मानले जात आहे. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या पराभवाचा वचपा काढण्याचे भाजपाचे प्रयत्न असणार आहे, त्यामुळे निवडणूक बिनविरोध होण्याची कोणतीही शक्यता नाही. प्रताप पाटील चिखलीकर हेच भाजपाचे प्रबळ दावेदार आहेत. (Assembly Elections)

(हेही वाचा – Repo Rate : २०२५ पर्यंत रेपो दरात कपातीची शक्यता नाहीच)

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवार वसंतराव चव्हाणांना ५ लाख २८ हजार मते मिळाली होती तर भाजपाचे पराभूत उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांना ४ लाख ६९ हजार मते मिळाली होती. यामध्ये एससी, एसटी आणि अल्पसंख्याक समाजाची एकगठ्ठा मतदान झाले असल्याचे मानले जात होते. तर ओबीसी समाज हा भाजपाला मोठ्या प्रमाणात मतदान करतो असे मानले जाते. यंदा वंचित बहुजन आघाडीचाही उमेदवार असणार आहे. त्यामुळे त्याचाही फायदा भाजपाला होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, विधानसभा निवडणूक देखील त्याच दिवशी होणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत शिवसेना उबाठा आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्याकडून नांदेडमधील विधानसभा (Assembly Elections) जागांची मागणी होण्याची शक्यता आहे. येथे जर सहकारी पक्षांची मागणी मान्य झाली नाही, तर ज्या पद्धतीने लोकसभेत एकजुटीने तिन्ही पक्ष एकत्र आले होते, तसेच चित्र पोटनिवडणुकीत राहिल का, हाही महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला ही निवडणूक तेवढीशी सोपी जाईल असे वाटत नाही.

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अशोक चव्हाण यांचा नांदेड लोकसभा मतदारसंघात ताकद कमी झाल्याचे बोलले जात होते. परंतु त्यानंतर अशोक चव्हाण यांनी आपली स्ट्रॅटर्जी बदलत गावागावात छोट्या छोट्या कार्यक्रमांना उपस्थित राहण्याची तसेच सर्वसामान्य कार्यकर्त्यांना थेट भेटण्याची पद्धत सुरू केली. त्यातच त्यांचा पारंपारिक विधानसभा मतदारसंघ भोकर या ठिकाणी त्यांची मुलगी श्रीजया ही भाजपाकडून उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न देखील सुरू केला आहे. यंदाच्या महाराष्ट्र विधानसभाच्या निवडणुकांसोबतच नांदेड लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी ही अशोक चव्हाण यांच्यासाठी एक प्रकारे सत्वपरीक्षा ठरणार आहे. (Assembly Elections)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.