Assembly Elections 2024: तब्बल ७ हजार फलक, बॅनर्स, झेंडे यांनी केले होते मुंबईला विद्रूप

198
Assembly Elections 2024: तब्बल ७ हजार फलक, बॅनर्स, झेंडे यांनी केले होते मुंबईला विद्रूप
विशेष प्रतिनिधी, मुंबई 
भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ चा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. तेव्हापासून मुंबई महानगरपालिका प्रशासनाने संपूर्ण मुंबईतील भित्तीपत्रके, फलक, बॅनर्स, झेंडे आदी हटवण्याची  कार्यवाही जोमाने सुरू केली आहे. त्यानुसार आचारसंहिता लागू झाल्यापासून ४८ तासांत म्हणजे  १५ ते १७ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत संपूर्ण मुंबईत मिळून एकूण ७ हजार ३८९ इतके भित्तीपत्रके,  फलक, बॅनर्स, झेंडे आदी काढण्यात आली आहेत. त्यामुळे मागील काही महिन्यात राजकीय पक्षांकडून लावलेल्या या सुमारे सात हजार बॅनर, फलक आणि झेंडे आदींमुळे मुंबईला विद्रूप करून टाकले होते. आता मुंबई सुंदर दिसू लागली आहे, अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून ऐकायला मिळत आहे.
मुंबईत कुठेही अनधिकृतपणे फलक आणि बॅनर्स लावू नये…
मुंबईतील विधानसभा निवडणूक (Assembly Elections 2024) पारदर्शक व निर्भय वातावरणात पार पाडण्याकरीता आचारसंहितेची अतिशय काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. आदर्श आचारसंहिता कालावधीत मुंबईत कुठेही अनधिकृतपणे फलक आणि बॅनर्स लावू नयेत. ज्याठिकाणी अनुज्ञेय आहे, त्याठिकाणी विहित परवानगी प्राप्त करून त्यानंतरच जाहिरात फलक, पोस्टर्स, बॅनर्स प्रदर्शित करता येतील, असे आवाहनदेखील प्रशासनाने केले आहे.
मुंबईत अतिरिक्त मनुष्यबळ तैनात
तसेच, नियमांचे उल्लंघन करून व अनधिकृतपणे जाहिरात फलक, बॅनर्स, पोस्टर्स इत्यादी प्रदर्शित केल्याचे आढळल्यास त्यावर तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त  भूषण गगराणी यांनी दिले आहेत. आदर्श आचारसंहितेच्या कालावधीत संपूर्ण मुंबईत अतिरिक्त मनुष्यबळ तैनात ठेवून सातत्याने अनधिकृत जाहिरात फलक, बॅनर्स इत्यादी प्रचार साहित्यावर  कार्यवाही करण्याच्या सूचना अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा यांनी दिल्या आहेत.
सर्वाधिक बॅनरची संख्या..
आचारसंहिता लागू झाल्यानंतर ४८ तासांत (दिनांक १५ ते १७ ऑक्टोबर २०२४)  बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) क्षेत्रात भित्तीपत्रके (९४२), फलक (८१७), कटआऊट होर्डिंग (५९६), बॅनर्स (३७०३), झेंडे (१३३१) आदी मिळून एकत्रितपणे ७ हजार ३८९ साहित्य अनुज्ञापन खात्याने निष्कासित केले आहे. अनुज्ञापन खात्याच्या  चमुमार्फत महानगरपालिकेच्या सर्व प्रशासकीय विभागामध्ये सातत्याने अशा पद्धतीचे साहित्य निष्कासन कार्यवाही करण्यासाठीच्या सूचना उपायुक्त (विशेष)  चंदा जाधव यांनी दिल्या आहेत. (Assembly Elections 2024)
तक्रारींचे निराकरण १०० मिनिटांत
Cvigil App  या एपच्या मदतीनेही मतदारांना आचारसंहिता उल्लंघन संदर्भातील तक्रार करण्याची सुविधा भारतीय निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिली आहे.  या एपवर केलेल्या तक्रारींचे निराकरण १०० मिनिटांत केले जाते. त्याशिवाय मतदारांना १९५० या हेल्पलाईन क्रमांकाचाही पर्याय पुरविण्यात आला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.