BMC : उष्मा वाढला, तहान लागली नसली तरी पुरेसे पाणी प्या!

184

विशेष  प्रतिनिधी

BMC : उन्हाळी ऋतू तसेच तापमानाच्या वाढत्या पाऱ्यांमुळे उष्माघातासारखे (उष्माघाता) प्रकार होऊ नये यासाठी, मुंबई महानगरपालिकेने उष्माघात नियंत्रण आणि प्रतिबंधासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. मुंबई महानगरपालिका क्षेत्रात जाणवत असलेल्या उष्ण लाटेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी या काळात काय करावे? काय करू नये याबाबतच्या सूचना राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (National Disaster Management Authority) मार्गदर्शक तत्वांनुसार नियमित करण्यात आल्या आहेत.  यामध्ये तहान लागली नसली तरी पुरेसे पाणी प्यावे तसेच प्रवासात पाणी सोबत न्यावे अशाप्रकारचा सूचना करत नागरिकांनी या मार्गदर्शक तत्वांचे पालन करावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेमार्फत करण्यात येत आहे. (BMC)

सद्यस्थितीत मुंबईसह राज्याच्या काही भागांमध्ये तीव्र उष्ण लाट जाणवू लागली आहे. भारतीय हवामान खात्याने (Meteorological Department of India) वर्तवलेल्या अंदाजानुसार ही परिस्थिती ११ मार्च २०२५ पर्यंत राहू शकते. त्याचप्रमाणे मार्च आणि एप्रिल महिन्यात अशी परिस्थिती वारंवार उद्भवू शकते. उष्ण लहरींची परिस्थिती वारंवार उद्भवण्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी या काळात काय करावे, काय करू नये, याबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहेत.

(हेही वाचा – लोकाभिमुख योजनांना चालना देणारा अर्थसंकल्प; कौशल्य विकास मंत्री Mangalprabhat Lodha यांचे प्रतिपादन)

येत्या काळात उष्णतेची संभाव्य लाट आणि उष्माघात यासारख्या आव्हानांचा सामना करण्यासाठी मुंबईकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याचे निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांनी दिले आहेत.

महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन खात्याद्वारे असे केले आवाहन

उष्णतेच्या लाटेचा प्रभाव कमी करण्यासाठी आणि उष्माघातामुळे होणारे गंभीर आजार किंवा मृत्यू टाळण्यासाठी, तुम्ही खालील उपाय करू शकता:

  • तहान लागली नसली तरी पुरेसे पाणी प्या.
  •  हलके, सौम्य व फिक्या रंगाचे, सैल आणि सच्छिद्र सुती कपडे घाला. उन्हात बाहेर जाताना संरक्षक गॉगल, छत्री / टोपी, बूट किंवा चप्पल वापरा.
  • प्रवासात पाणी सोबत ठेवा.
  • मद्यपान, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड शीतपेये (कोल्ड्रिंक्स) टाळा, कारण त्याद्वारे शरीराचे निर्जलीकरण होते.
  • उच्च प्रथिनेयुक्त अन्न टाळा आणि शिळे अन्न खाऊ नका.
  • तुम्ही बाहेर काम करत असाल, तर टोपी किंवा छत्री वापरा. शक्य असल्यास मोठ्या सुती कापडाने डोके व चेहरा झाकून घ्या.
  •  तुमच्या डोक्यावर, मानेवर, चेहरा आणि हातपायांवर ओलसर कापडही वापरा.
  •  पार्क केलेल्या वाहनांमध्ये लहान मुले किंवा पाळीव प्राणी सोडू नका.
  •  तुम्हाला अशक्त किंवा आजारी वाटत असल्यास, ताबडतोब डॉक्टरांना भेटा.
  •  ओआरएस, लस्सी, तोराणी (तांदूळ पाणी), लिंबू पाणी, ताक, नारळपाणी इत्यादी घरगुती पेये नियमितपणे प्या. यामुळे शरीराला पुन्हा ‘हायड्रेट’ करण्यास मदत होते.

    (हेही वाचा – Maharashtra Budget 2025 मधून SC-ST आणि ओबीसी प्रवर्गाला काय मिळाले?)

  • जनावरांना सावलीत ठेवा आणि त्यांना भरपूर पाणी द्या.
  • तुमचे घर थंड ठेवा, पडदे, शटर किंवा सनशेड वापरा आणि रात्री खिडक्या उघड्या ठेवा.
  • पंखे, ओले कपडे वापरा आणि वारंवार थंड पाण्याने आंघोळ करा.
  • उष्माघातामुळे बाधित झालेल्या व्यक्तीवर उपचार करण्यासाठी सूचना :
  •  व्यक्तिला थंड जागी, सावलीखाली ठेवा. तिला / त्याला ओल्या कपड्याने पुसून काढा / वारंवार शरीर धुवा. डोक्यावर सामान्य तापमानाचे पाणी घाला. मुख्य गोष्ट म्हणजे त्याच्या शरीराचे तापमान कमी होईल, असे पहावे.
  •  व्यक्तिला ‘ओआरएस’ प्यायला द्या किंवा लिंबू सरबत / तोराणी किंवा जे काही शरीरामध्ये पाण्याचे प्रमाण संतुलित (रीहायड्रेट) करण्यासाठी उपयुक्त आहे, असे पेय द्या.
  •  व्यक्तिला ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्रात घेऊन जा. उष्माघात जीवघेणा ठरू शकतो म्हणून रुग्णाला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्याची गरज आहे, हे सदैव ध्यानात ठेवा.
  •  उष्माघाताचा प्रकार टाळण्यासाठी नागरिकांनी सदर उपाययोजना व मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने पुन्हा एकदा करण्यात येत आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.