-
सायली डिंगरे-लुकतुके
सगळीकडे डिजिटलायझेशनला प्रोत्साहन दिले जात आहे. त्याचसोबत डिजिटल माध्यमांचा वापर करून सायबर फसवणुकीचे प्रकारही प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Budget session) याविषयी उपस्थित करण्यात आलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी याविषयीची धक्कादायक माहिती दिली आहे. वर्षभरात नागरिकांची जवळपास ७ हजार ६०० कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. (Cyber Crime)
५० सायबर पोलीस ठाणे; मात्र फसवणुकीचा आकडा वाढता
- राज्यातील जिल्हा आयुक्तालय स्तरावर निर्माण करण्यात आलेल्या ४३ सायबर लॅब तंत्रज्ञानयुक्त गुन्हे अन्वेषण केद्रांना सायबर पोलीस ठाणे म्हणून घोषित करण्यात आले आहे. सद्यःस्थितीत राज्यात एकूण ५० सायबर पोलीस ठाणे कार्यान्वित आहेत.
- फॉरेन्सिक विश्लेषणासाठी अत्याधुनिक असे ‘Centre of Excellence in Digital Forensic’ ही न्यायसाहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा पुणे येथे सुरु करण्यात आलेली आहे.
- न्यायसाहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिपत्याखालील मुंबई, नागपूर, पुणे, छ. संभाजीनगर, नाशिक, अमरावती, कोल्हापूर व नांदेड या प्रयोगशाळामध्ये अत्याधुनिक संगणक गुन्हे विभाग कार्यरत आहेत.
- या प्रकरणांचा तपास जलद गतीने होण्यासाठी महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प हा जागतिक स्तरावरील अत्याधुनिक प्रकल्प नवी मुंबई येथील सायबर मुख्यालयात सुरु करण्यात आला आहे.
- सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी नोडल सायबर पोलीस स्टेशनसह सहा प्रमुख विभाग कार्यरत आहेत.
- पोलिसांना आवश्यक ते मनुष्यबळ आणि यंत्रणा उपलब्ध करून देऊनही सायबर फसवणुकीची प्रकरणे वाढत आहेत, याविषयी चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
उच्च न्यायालयानेही फटकारले
नुकतेच मुंबई उच्च न्यायालयानेही (Mumbai High Court) पोलिसांना फटकारले आहे. सायबर फसवणुकीच्या प्रकरणात पोलिसांनी तात्काळ दखल घेऊन पीडितांना मदत करावी, असे मत न्यायालयाने मांडले आहे. ‘सायबर गुन्ह्यांच्या प्रकरणांत वेळ हीच कळीची बाब असते. त्यामुळे पीडितांचे अधिक नुकसान होऊ नये, यासाठी पोलिसांनी तात्काळ कृती करणे गरजेचे आहे. पोलिसांकडे तक्रार करणे हे पीडित व्यक्तीचे पहिले पाऊल असते. स्वाभाविकपणे पोलिसांकडून त्वरेने कार्यवाही अपेक्षित आहे. परंतु, तसे होतच नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे याविषयीच्या तुमच्या कारभारात सुधारणा करा’, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना फटकारले. (Cyber Crime)
सायबर फसवणूकीच्या प्रकरणी कुठे तक्रार कराल ?
- 8 जवळच्या पोलीस स्टेशनला ताबडतोब भेट द्या.
- 8सायबर गुन्ह्यांच्या तक्रारी ऑनलाइन नोंदवण्यासाठी, राष्ट्रीय सायबर गुन्हे अहवाल पोर्टलला भेट द्या. हे पोर्टल https://cybercrime.gov.in/ येथे उपलब्ध आहे. या पोर्टलमध्ये दोन विभाग आहेत. एक विभाग महिला आणि मुलांशी संबंधित गुन्ह्यांची तक्रार करण्यासाठी आहे (जिथे तक्रार गुप्तपणे देखील दाखल करता येते). दुसरा विभाग इतर प्रकारच्या सायबर गुन्ह्यांची तक्रार करण्यासाठी आहे. तुम्ही १५५२६० या हेल्पलाइन क्रमांकावर डायल करून ऑफलाइन देखील तक्रार दाखल करू शकता.
- 8 तुम्हाला तुमची संवेदनशील वैयक्तिक माहिती किंवा बँक तपशील विचारणारा फसवणूकीचा एसएमएस, ई-मेल, लिंक, फोन कॉल आला, तर कृपया www.reportphishing.in ला भेट देऊन महाराष्ट्र सायबरच्या वेब पोर्टलवर तक्रार करा.
