-
ऋजुता लुकतुके
भारतातून बाहेर निर्यात होणाऱ्या स्मार्टफोनचं मूल्य आता २ लाख कोटी रुपयांवर गेलं आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षात स्मार्टफोन निर्यातीने हा उच्चांक प्रस्थापित केला आहे. इंडिया सेल्युलर अँड इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशनने ही आकडेवारी दिली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत स्मार्टफोन निर्यातील ५५ टक्क्यांची वाढ झाली आहे. आधीच्या आर्थिक वर्षांत ही निर्यात १,२९,००० कोटी रुपयांची होती. स्मार्टफोन ही देशातून निर्यात होणारी सगळ्यात मोठी वस्तू ठरली आहे. यापूर्वी हिरे आणि पेट्रोलियम पदार्थांची निर्यात ही सर्वाधिक होती. (Smartphone Export)
(हेही वाचा – Gold Price Surge : एका दिवसांत सोन्याच्या किमती ६,००० रुपयांनी कशा वाढल्या?)
भारताच्या मेक इन इंडिया या उपक्रमाला मिळालेलं हे मोठं यश मानलं जातं आहे. तसंच या कामगिरीचं श्रेय केंद्र सरकारच्या प्रोडक्शन इन्सेन्टिव्ह योजनेला दिलं जात आहे. सरकारकडून उत्पादन क्षेत्राला मिळणाऱ्या मदतीमुळे मोबाईल उत्पादनात वाढ झाल्याचं निरीक्षण आहे. या योजनेमुळे एकूणच देशात इलेक्ट्रॉनिक वस्तूंचं उत्पादन वाढलं आहे. यातून भारतात मोठ्या प्रमाणात परकीय गुंतवणूकही येत आहे. शिवाय उत्पादन क्षेत्रात भारताचा दबदबा तयार होत आहे. ॲपल आणि सॅमसंग या मोठ्या स्मार्टफोन कंपन्यांनी अलीकडे आपलं फोन उत्पादन हे चीनमधून हलवून भारताकडे वळवलं. त्याचा फायदाही भारताला मिळाला आहे. स्मार्टफोन तसंच साध्या मोबाईल फोनचं उत्पादन मिळून भारतात एकूण ५,२१,०० कोटी रुपयांचं मोबाईल फोन उत्पादन झालं आहे. (Smartphone Export)
(हेही वाचा – रायगडावरील सभेत खासदार उदयनराजे यांनी Amit Shah यांच्याकडे केल्या ‘या’ मागण्या)
स्मार्टफोन उत्पादनात वाढ झाली असली तरी अजूनही या क्षेत्रात भारतासमोरच्या अडचणी कमी झालेल्या नाहीत. ‘अजूनही उत्पादनाचा खर्च कमी करण्याचं आव्हान आपल्यासमोर आहे. कारण, जागतिक स्तरावर उत्पादन खर्चातील स्पर्धा वाढली आहे. त्याचबरोबर फोनचा पुरवठा म्हणजेच लॉजिस्टिक्स हा देखील एक मोठा प्रश्न आहे. पायाभूत सुविधा उभारणीच्या बाबतीतही आपण थोडे कमी आहेत. त्यामुळेच ॲपल सारख्या कंपनीने आपलं उत्पादन अजूनही पूर्णपणे भारतात हलवलेलं नाही. या क्षेत्रात वाढीची अजूनही संधी आहे,’ असं इंडिया सेल्युलर व इलेक्ट्रॉनिक्स असोसिएसनचे अध्यक्ष पंकज महेंद्रू यांनी मीडियाशी बोलताना स्पष्ट केलं आहे. इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील उत्पादन २०३० पर्यंत ५०० अब्ज अमेरिकन डॉलरपर्यंत घेऊन जाण्याचं भारताचं उद्दिष्टं आहे. (Smartphone Export)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community