“टोकाची भूमिका घ्यायला भाग पाडू नका”, अजित पवारांचा एसटी कर्मचाऱ्यांना इशारा

102

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन अद्याप सुरूच असून एसटीच्या सेवेतून ११ कर्मचारी बडतर्फ, २५७ जणांना ‘कारणे दाखवा’ नोटीस महामंडळाकडून बजावण्यात आली आहे. असे असले तरी विलिनीकरणाच्या मागणीवर राज्यातील काही कर्मचारी आंदोलनाच्या भूमिकेत आहेत. राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्यात आली आहे. परिवहन मंत्री अनिल परब एसटी कर्मचाऱ्यांसोबत चर्चा करत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांनी समजूतदारपणा दाखवावा, राज्य सरकारच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. नाईलाजाने राज्य सरकारला टोकाची भूमिका घ्यायला भाग पाडू नका, असेही अजित पवार म्हणाले.

(हेही वाचा – ‘लालपरी’च्या सेवेतून ११ कर्मचारी बडतर्फ, २५७ जणांना ‘कारणे दाखवा’ नोटीस)

एसटी कर्मचाऱ्यांचे हट्ट योग्य नाही

जळगाव येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अजित पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनासंदर्भात भाष्य केले. यावेळी लवकरात लवकर कामावर रूजू होण्याची विनंती अजित पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांनी केली. एसटी हे गरिबांचे वाहन आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे हट्ट योग्य नाही, त्यांनी आता दोन पावले मागे सरकायला हवे. राज्यातील शाळा आणि कॉलेज सुरु झाले आहेत त्यामुळे मुलांना गोर गरिबांना प्रवास करण्यासाठी एसटी हा पर्याय आहे. अशा परिस्थितीमध्ये कर्मचारी हट्टाला पेटले आहेत. यामध्ये अतिशय समजूतदारपणे भूमिका घेतली पाहिजे, असे अजित पवार म्हणाले आहेत.

कर्मचाऱ्यांनी संमजसपणे भूमिका घ्यावी

मेस्मा कायद्यासंदर्भात उद्या काही निर्णय घेतला किंवा टोकाचा निर्णय घेऊन तुटेपर्यंत ताणले तर मागच्या काळामध्ये काय अवस्था झाली हे बघितले. जर कुणी ऐकायला तयार नसेल आणि नविन भरती सुरु केली तर नोकरीचा प्रश्न येणार आहे. याबद्दल पण मंत्रीमंडळात चर्चा झाली आहे. इथपर्यंत टोकाची वेळ येऊ नये, अशी माझी एसटी कर्मचाऱ्यांना विनंती आहे. कर्मचाऱ्यांना पगार कमी होता पण मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आणि निर्णय देण्यात आला आहे. त्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांचे मानधन बऱ्यापैकी वाढवण्यात आले आहे. त्यामुळे आता एसटी कर्मचाऱ्यांनी संमजसपणे भूमिका घ्यावी, असे अजित पवार यांनी म्हटले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.