#RussiaUkraineWar युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी भारताने उचलले ‘हे’ पाऊल!

111

रशिया-युक्रेनमधील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशात परत आणण्यासाठी केंद्र सरकार विशेष प्रयत्न करत आहे. युक्रेनमधील भारतीयांना परत मायदेशी आणण्यासाठी एअर इंडियाचे विमान बुखारेस्टला पोहोचले आहे. एअर इंडियाच्या विमानाने शनिवारी सकाळी रोमानियाची राजधानी बुखारेस्टला जाण्यासाठी मुंबई विमानतळावरून उड्डाण केले. महाराष्ट्रातील जवळपास १२०० विद्यार्थी सध्या युक्रेनमध्ये आहेत.

( हेही वाचा : रशिया-युक्रेन युद्धात भारताने घेतली महत्वाची भूमिका! )

केंद्रीय मंत्री व महापौर करणार स्वागत 

विमान क्रमांक AI1943 या विमानाने पहाटे 3.40 वाजता उड्डाण केले. युक्रेनमधून भारतीय नागरिकांना घेऊन रोमानियाहून एअर इंडियाचे विमान आज दुपारी अंदाजे चार वाजता मुंबईत दाखल होईल अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि महापौर किशोरी पेडणेकर मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मायदेशी परतणाऱ्या भारतीयांचे स्वागत करतील.

युद्धपातळीवर प्रयत्न सुरू

युक्रेनमधून भारतीयांची पहिली तुकडी सुसेवा सीमा ओलांडून रोमानियाला पोहोचली. येथून आमची टीम आता भारतीय नागरिकांना बुखारेस्ट पर्यंत घेऊन जाईल अशी माहिती, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी एअर इंडिया शनिवारी बुखारेस्ट आणि हंगेरीची राजधानी बुडापेस्ट येथे उड्डाणे होणार आहेत. भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी, भारतीय दूतावासाशी संपर्क साधल्याशिवाय कोणत्याही सीमेवर नागरिकांनी जाऊ नये अशा सूचना अडकलेल्या नागरिकांना देण्यात आल्या आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.