खासगीकरणाविरोधात ‘बेस्ट’ कर्मचारी आक्रमक!

108

कोरोना काळात बेस्ट कर्मचाऱ्यांनी समस्त मुंबईकरांना अविरत सेवा दिली. परंतु मुंबईकरांची बेस्ट हळूहळू खासगीकरणाच्या वाटेवर जात आहे, यामुळे कर्मचारी वर्गात मोठ्या प्रमाणात असंतोष पसरला आहे. याच पार्श्वभूमीवर बेस्ट संयुक्त कामगार कृति समितीच्या वतीने २ मार्चला वडाळा आगारात शशांक राव यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले. बेस्टमध्ये खासगी कंत्राटदारांच्या वाढत्या हस्तक्षेपाच्या निषेधार्थ हे एक दिवसीय आंदोलन होते.

२०१७ रोजी भाऊबीजेच्या दिवशी बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप केला होता. त्यावेळी सध्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मध्यस्थी करत शब्द दिला होता की, बेस्ट कर्मचाऱ्यांचा पगाराचा प्रश्न तातडीने सोडवू. तसेच बेस्टचा ‘अ’ अर्थसंकल्प पालिकेच्या ‘क’ अर्थसंकल्पात आम्ही विलीन करू असे जाहीर आश्वासन उद्धव ठाकरे यांनी कर्मचाऱ्यांना दिले होते. ही आश्वासने पूर्ण न केल्याने कालांतराने २०१९ मध्ये बेस्टने पुन्हा एकदा संप केला. शशांक राव यांच्या मार्गदर्शनाखाली हा संप पुकारला गेला होता. यात मोठ्या संख्येने बेस्ट कर्मचारी सहभागी झाले होते.

( हेही वाचा : लसवंतांना मिळणार लोकल प्रवास! सरकारची भूमिका )

२०१९ चा करार

या २०१९ च्या संपादरम्यान सामंजस्य करार करण्यात आला होता. त्यानुसार बेस्टचा विलिनीकरणाचा प्रश्न सोडवला जाईल, तसेच ३ हजार ३३७ बेस्ट बसगाड्या कायमस्वरुपी राखल्या जातील व या गाड्यांना लागणारे कर्मचारी नव्याने भरती केले जातील. परंतु याउलट आता बेस्ट प्रशासन केवळ खासगी गाड्या उपक्रमात भरती करत आहेत, असा आरोप शशांक राव यांनी केला आहे. स्वत:ची एकही गाडी उपक्रम खरेदी करत नाही. गेल्या दोन वर्षांत बेस्टच्या स्वमालकीच्या गाड्यांचा बस ताफा अर्ध्यावर आला आहे. आता १८०० गाड्या बेस्टकडे उरल्या आहेत. त्यातील १ हजार गाड्या पुढील वर्षापर्यंत भंगारात जातील, तर २०२५ पर्यंत स्वमालकीच्या केवळ २२५ बसगाड्या उरतील आणि जवळपास १० हजारांचा कर्मचारी वर्ग उरेल. तसेच कोरोना काळात अविरत सेवा देऊनही कर्मचाऱ्यांना आजवर थकीत कोविड भत्ता देण्यात आलेला नाही, असेही राव यांनी सांगितले.

सरकारला इशारा 

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून बेस्ट उपक्रमाविषयी उलट-सुलट अफवा पसरवल्या जात आहेत. परंतु बेस्ट उपक्रमाने खासगीकरणाचा कोणताही विचार केला नाही आणि भविष्यकाळात देखील करणार नाही. असे परिपत्रक बेस्ट जनसंपर्क अधिकाऱ्यांनी प्रसिद्ध केले होते. परंतु महाशिवरात्रीला सुट्टीच्या दिवशी परिपत्रक कसे प्रसिद्ध झाले आणि हे परिपत्रक लेखी स्वरूपात असून, यावर वरिष्ठांची स्वाक्षरी नसताना या पत्रकाबाबत काय समजावे, असा सवालही आंदोलनादरम्यान शशांक राव यांनी केला आहे.

(हेही वाचाः महापालिकेच्या पूल विभागाचे मुख्यमंत्र्यांच्या निर्देशाकडे दुर्लक्ष! घाटकोपर-मानखुर्द पुलावरील अवजड वाहतूक बंदच)

आम्ही शांत बसणार नाही

खासगीकरणाच्या विरोधातील लढा आपण सगळे आजपासून सुरू करणार आहोत. सोमवार ७ मार्चपासून कर्मचाऱ्यांना आम्ही वेळापत्रक देऊ. हा लढा सरकार, भांडवलदारांच्या विरोधात असून तो सोपा नाही. मुंबईकर आपल्याला नक्कीच साथ देतील. विलीनीकरण झाल्याशिवाय, खासगीकरण रद्द होत नाही, तोवर आम्ही शांत बसणार नाही, अशा इशारा शशांक राव यांनी सरकारला दिला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.