मला बोलू द्या नाहीतर आत्महत्या करेन! असे का म्हणाले रवी राणा?

132

सरकारमधील मोठ्या नेत्याने मला तुमच्यावर गुन्हा दाखल करायला सांगितले आहे, असे पोलीस आयुक्त आरती सिंग म्हणाल्या होत्या. त्यावेळी पोलीस माझ्या घरी घुसले आणि माझ्या वृद्ध आईला त्रास दिला आणि खासदार नवनीत राणा यांच्या भावना दुखावल्या, मी नवी दिल्लीत असताना माझ्यावर कलम ३०७, ३५३ दाखल केला. घटना घडल्यावर रात्री १०.३० वाजता माझ्यावर गुन्हा दाखल केला. याविषयावर मला सभागृहात बोलू द्यावे, नाहीतर मी आत्महत्या करेन, अशा शब्दांत आमदार रवी राणा यांनी विधानसभेत व्यथा मांडली.

याप्रकरणी पोलीस आयुक्ताला निलंबित करावे. मला तत्कालीन गृहमंत्री आर आर पाटील यांची आठवण होते. जर तुम्ही वाझे यांच्या सारख्यांना सेवेत घेतले, तर तुमचाही अनिल देशमुख होईल, असा इशारा आमदार रवी राणा दिला. यावेळी बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, ३०७, ३५३ गुन्हा लावणे चुकीचे आहेत, सर्वोच्च न्यायालयाने हे आरोप एका मिनिटात फेटाळून लावले, त्यामुळे सरकार याची दाखल घेणार आहे का? निदान याची दाखल घेतली पाहिजे. सरकारने काहीतरी निर्देश दिले पाहिजे, असे म्हणाले.

(हेही वाचा नवाब मलिक गर्दुल्ले आहेत! मोहित कंबोजांनी दाव्यासह केला आरोप)

त्या आश्वासनांचे काय झाले?

हा विषय आमदाराचा आहे म्हणून याकडे पाहू नये. २४ डिसेंबर रोजी तुम्ही सदस्यांचा अवमान होऊ नये म्हणून २२ मिनिटे कथन केले. आज पोलीस प्रशासन ज्याप्रकारे अवमान करत आहे, त्यावर तुम्ही आश्वासन दिले होते कि यावर आम्ही आमदारांची समिती स्थापन करू, त्याचे काय झाले आहे. ज्यापद्धतीने पोलिसांनी हे गुन्हे दाखल करतात आधी गुन्हेगारांचे राजकीयकरण व्हायचे आता पोलिसांचे सुरु आहे. पोलीस यंत्रणेवरील १४ हजार कोटी वाया जात आहे. सुडाची, बदला घेण्याची भावना चालता कामा नये, असे आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले. यावेळी राष्ट्रवादीचे नेते भास्कर जाधव म्हणाले, या सदनातील एखाद्या सदस्याला एखाद्या मंत्र्यावर आरोप करायचा असेल, तर त्याआधी त्याने विधानसभा नियम ३५ नुसार विधानसभा अध्यक्षाला नोटीस दिली पाहिजे होती, नसेल तर त्यांची नावे कामकाजातून काढून टाकावे, अशी मागणी केली.

वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी करणार – गृहमंत्री

याप्रकरणात रवी राणा यांच्यावर कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री यांनी कुठलाही आदेश दिला नव्हता. याविषयावर वरिष्ठ अधिकाऱ्याकडून चौकशी केली जाईल आणि त्या अहवालावर विरोधी पक्षनेत्यासोबत चर्चा करू, असे आश्वासन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले. रवी राणा यांनी त्यांच्या भावना मांडल्या, घटना ज्या दिवशी घडली त्या दिवशी अमरावतीत शिवरायांच्या पुतळ्याची स्थापना परवानगीशिवाय स्थापन केला होता, परवानगीशिवाय असे करता येत नाही, हा नियम आहे. तो पुतळा कमी उंचीवर होता त्यामुळे महापालिका आयुक्तांनी त्यांच्या अधिकारात तो पुतळा काढला. ज्या दिवशी महापालिका आयुक्तांवर शाई फेकण्यात आली, त्या दिवशी अमरावतीत असे काही वातवरण निर्माण झाले होते की, पोलिसांना कठोर कारवाई करावी लागली, असेही गृहमंत्री म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.