युनेस्कोने स्थान दिल्यामुळे कोकणातील कातळशिल्पांना उज्ज्वल भवितव्य

164

कोकणातील विस्तीर्ण कातळांवर कोरण्यात आलेल्या प्राचीन शिल्पांना युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांच्या तात्पुरत्या यादीत स्थान मिळाल्याने कोकणातील या ठेव्याला उज्ज्वल भवितव्य आहे, अशी प्रतिक्रिया कातळशिल्पांविषयी संशोधन करणाऱ्या निसर्गयात्री संस्थेचे सुधीर रिसबूड यांनी व्यक्त केली.

जिल्ह्यात १२५ गावात १,७०० शिल्पांचा शोध

युनेस्कोने रत्नागिरी जिल्ह्यातील सात, सिंधुदुर्गातील एक आणि गोव्यातील एक अशा एकूण नऊ ठिकाणच्या कातळशिल्पांचा समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीत केला आहे. त्यामुळे अश्मयुगीन काळापासूनची ही कातळशिल्पे आता आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचली आहेत. गेल्या दहा वर्षांपासून रत्नागिरीतील निसर्गयात्री संस्था कातळशिल्पांचा शोध घेत असून कातळशिल्पांचा पुरातन ठेवा जागतिक वारसा म्हणून जगापुढे यावा, यासाठी प्रयत्नशील आहे. श्री. रिसबूड, प्रा. धनंजय मराठे आणि प्रा. सुरेंद्र ठाकूरदेसाई यांनी निसर्गयात्री संस्थेच्या माध्यमातून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कातळशिल्पांचा शोध घेतला आहे. गेल्या बारा वर्षांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील १२५ गावांमध्ये सुमारे एक हजार ७०० कातळशिल्पांचा शोध लागला आहे. कातळशिल्पांचे हे महत्त्व आधी स्थानिक जनतेला कळावे आणि त्यातून कोकणातील पर्यटनाला चालना मिळावी, यासाठी निसर्गयात्री संस्थेने दोन दिवसांचा पहिला कातळशिल्प महोत्सव रत्नागिरीच्या ऐतिहासिक थिबा राजवाड्याच्या प्रांगणात भरविला होता. त्यापाठोपाठ युनेस्कोने कातळशिल्पांचा समावेश जागतिक वारसस्थळांमध्ये केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्याने निसर्गयात्री संस्थेचा उत्साह दुणावला आहे.

अश्मयुगीन आणि ऐतिहासिक कलेचा उत्तम नमुना

युनेस्कोकडून जगभरातील वारसास्थळांची यादी तयार केली जाते. गेल्या वर्षी कोकणातील गडकिल्ल्यांचा या यादीत समावेश झाला होता. गेल्या काही वर्षांत कोकणातील सड्यांवर कातळशिल्पांचा शोध लागला आहे. त्यामुळे वारसा स्थळांच्या यादीत समावेश होऊन कोकणातील कातळांवर कोरण्यात आलेल्या प्राचीन शिल्पांचे जतन आणि संवर्धन होण्यासाठी पुरातत्त्व विभागाकडून कातळशिल्पांचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. त्यानुसार युनेस्कोने जाहीर केलेल्या तात्पुरत्या यादीत या कातळशिल्पांना स्थान मिळाले आहे. त्यात रत्नागिरी जिल्ह्यातील कशेळी, रुंढेतळी, देवाचे गोठणे, बारसू, देवीहसोळ, जांभरूण, उक्षी, कुडोपी (जि.सिंधुदुर्ग) आणि गोव्यातील पानसायमोल या ठिकाणच्या कातळशिल्पांचा समावेश आहे. साधारणपणे दहा ते वीस हजार वर्षे जुनी आणि तिसऱ्या शतकापर्यंतचा वारसा सांगणारी ही कातळशिल्पे आहेत. अश्मयुगीन आणि ऐतिहासिक कलेचा उत्तम नमुना म्हणून या कातळशिल्पांकडे पाहता येते.

कातळशिल्पांचे संवर्धन झाल्यास…

कातळशिल्पांच्या संवर्धनासाठी रत्नागिरीमध्ये सुधीर रिसबूड, धनंजय मराठे, ऋत्विज आपटे, डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई आदी कार्यकर्ते निसर्गयात्री या संस्थेच्या माध्यमातून कार्यरत आहेत. युनेस्कोच्या तात्पुरत्या यादीतील समावेशाचा आनंद व्यक्त करून ऋत्विज आपटे म्हणाले की, कोकणातील कातळशिल्पे जगभरातील कातळशिल्पांपेक्षा वेगळी आहेत. जमिनीवरची शिल्पे फार दुर्मीळ आहेत. चित्रांतील हत्ती, एक शिंगी गेंडा असे कोकणात नसलेले प्राणी आणि मोठ्या आकाराच्या आकृत्या भारतात फार दिसत नाहीत. तसेच कोकणात काही ठिकाणी दगडी हत्यारेही मिळाली आहेत. त्यामुळे कोकणात अश्मयुगीन काळात माणूस राहून गेला आहे हे चित्रांवरून दिसते. कातळशिल्पांचे संवर्धन झाल्यास कोकणातील पर्यटनाला आणि एकूणच विकासाला चालना मिळेल.

(हेही वाचा – गुजरात पाठोपाठ आता ‘या’ राज्यातही शिकवणार ‘श्रीमद् भगवत् गीता’!)

कातळशिल्पांच्या संवर्धनासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया राज्यस्तरावर पूर्ण करून युनेस्कोच्या विहित नमुन्यातील सर्वंकष आणि सखोल प्रस्ताव सादर करण्यात येईल. केंद्रीय पुरातत्त्व विभागाकडून त्याची छाननी करून त्रुटी दूर करून घेतल्या जातील. त्यानंतर तो प्रस्ताव युनेस्कोला सादर केला जाईल. युनेस्कोचे तज्ज्ञ प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करतील. प्रस्तावातील सत्यासत्यता पडताळून, काही बदल आवश्यक असल्यास त्यानुसार सुधारणा सुचवल्या जातात. त्यांची पूर्तता केल्यानंतरच अंतिम यादीत स्थान मिळू शकते. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने कातळशिल्पांच्या संवर्धनासाठीची प्रक्रिया सुरू झाली आहे. असे पुरातत्त्व विभागाचे संचालक डॉ. तेजस गर्गे यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.