महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. 22 मार्चपासून सुरु झालेली पेट्रोल डिझेल वाढ अद्यापही कायम आहे. यातच आता उन्हाच्या तीव्र झळ्या सोसणा-या नागरिकांना आता लिंबूपाणीही पिणे कठीण झाले आहे. लिंबू दरात तब्बल चार पट वाढ झाली आहे. सध्या किरकोळ मार्केटमध्ये एक लिंबू 10 ते 12 रुपयांना विकले जात आहे.
रसवंत फळांची किंमतही वाढली
उन्हांच्या तीव्र झळांमुळे मुंबई, नवी मुंबई करांकडून फळांना मागणी वाढली आहे. लिंबू तर चार पटीने वाढले आहेच, पण कलिंगडसह इतर फळांच्या दरांतही वाढ झाली आहे. उन्हाळ्यापासून दिलासा देणा-या विविध फळांची प्रतिदिन 1 हजार टनापेक्षा जास्त विक्री होत आहे.
किमतीत 4 पट वाढ
उकाड्यापासून दिलासा मिळवण्यासाठी लिंबूपाणी व फळांच्या रसाला पसंती दिली जात असून, रसवंत फळांना मागणी वाढली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मार्चमध्ये दर दिवशी 15 ते 20 टन लिंबूची विक्री होत आहे. होलसेलमध्ये लिंबू 15 ते 35 रुपये किलोवरुन 60 ते 100 रुपयांवर पोहोचले आहे. किरकोळ मार्केटमध्ये एका लिंबाला 10 ते 12 रुपये मोजावे लागत आहेत.
( हेही वाचा :आता रात्रीच्या वेळी बिनधास्त करा रेल्वे प्रवास! )
उष्णतेपासून आराम मिळवण्यासाठी लिंबाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. पचनसंस्था सुरळित राखण्यास मदत होते. लिंबू शरीराची कार्ये टिकवून ठेवण्यास आणि रोगप्रतिकारक शक्तीचे नियमन करण्यास मदत करते. लिंबू हा पचन क्रिया मजबूत करणारा रस तयार करतो. तसेच, लिंबाने रक्त शुद्ध होते, लिंबू कोलेरा आणि मलेरिया दरम्यान उपचार म्हणून वापरला जातो.