विद्याविहारकरांची पूराची समस्या मिटणार, हे काम महापालिकेने घेतले हाती

116

विद्याविहार पूर्व येथील शास्त्री नगर, शिवकृपा सोसायटी, ओएनजीसी वसाहत तसेच विद्याविहार रेल्वे स्थानक परिसरात तुंबणाऱ्या पाण्याच्या समस्येवर आता मात करण्यात येणार असून पावसाळ्यातील पूर परिस्थितीला कारणीभूत ठरणाऱ्या सोमय्या नाल्याचे रुंदीकरण करण्यात येणार आहे.

( हेही वाचा : कुर्ल्यातील एलबीएससह इतर भागातील पूर रोखण्यासाठी असाही प्रयत्न! )

नाल्याचे रुंदीकरण व सुधारणा करण्याचा निर्णय

विद्याविहार रेल्वे स्थानक परिसरात तुंबणाऱ्या पाण्यामुळे रेल्वे मार्गासह रस्त्यांवरील वाहतूक विस्कळीत होत असल्याने येथील पूरपरिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी महापालिकेच्यावतीने सोमय्या (विद्याविहार) नाला प्रणालीचा अभ्यास करण्यासाठी एम.डब्ल्यू. एच यांची सल्लागार म्हणून नियुक्ती केली होती. या सल्लागाराच्या अभ्यास अहवालात त्यांनी सोमय्या नाला प्रणालीमध्ये सुधारणा करण्याची शिफारस केली होती. त्यानुसार विद्याविहार येथील सोमय्या (विद्याविहार) नाला ते तानसा मेनपर्यंत नाल्याचे रुंदीकरण व सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे.

यासाठी मागवलेल्या निविदेमध्ये डी. बी. इन्फ्राटेक ही कंपनी पात्र ठरली असून यासाठी १४ कोटी ३६ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. या प्रस्तावांना स्थायी समितीने मंजुरी दिलेली असल्याने या कामांना आता प्रत्यक्षात सुरुवात होणार आह. हे काम पावसाळा वगळून १२ महिन्यांच्या अवधीत होणार आहे.

मुंबईत प्रत्येक पावसाळ्यात सोमय्या नाल्यामुळे या परिसरात पाणी तुंबण्याचे प्रकार घडत असून यामुळे परिसरातील नागरिकांची गैरसोय होत असल्याने हे काम पूर्ण झाल्यास विद्याविहारकरांची तुंबणाऱ्या पाण्याची समस्या मिटणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.