एसटी आंदोलकांचा हेतू शुद्ध नव्हता! आव्हाडांचा खळबळजनक आरोप

95

राज्य परिवहन महामंडळाच्या कामगारांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ला केला. या संपूर्ण प्रकरणावरून अनेक तर्क-वितर्क लढवले जात असताना जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. आव्हाडांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून यासंदर्भात केलेले ट्वीट चर्चेत आले आहे. पवारांच्या घरी हल्ला झाला. हल्ला करणाऱ्यांचा हेतू स्वच्छ नव्हता. त्यांनी शरद पवारांच्या घराची रेकी केली होती. त्यांना शरद पवारांना शारीरिक इजा करायची होती. महाराष्ट्राचे नशीब असे काही घडले नाही, असे आव्हाडांनी म्हटले आहे.

सदावर्तेंना ११ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी 

शुक्रवारी मोठ्या संख्येने आंदोलक एसटी कर्मचारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी धडकले. यावेळी कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी करतानाच काहींनी पवारांच्या निवासस्थानाच्या दिशेने चपला देखील भिरकावल्या. या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून सत्ताधारी आणि विरोधकांकडून दावे-प्रतिदाव्यांचे राजकारण केले जात आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेचे आमदार आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी खळबळजनक दावा केला आहे. शरद पवारांच्या निवासस्थानी जमलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या अवस्थेसाठी शरद पवारांना जबाबदार धरत त्यांच्या घराच्या दिशेने चपला भिरकावल्या. यावरून पोलिसांनी कारवाई करत १०९ आंदोलक कर्मचारी आणि आंदोलकांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक केली आहे. सदावर्तेंना ११ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून इतर आंदोलकांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

(हेही वाचा पवारांच्या घरावरील हल्ल्यास भाजपाला जबाबदार धरणारे अल्पबुद्धीचे!)

अजित पवारांची नाराजी

यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील संशय व्यक्त करणारी प्रतिक्रिया दिली आहे. या आंदोलकांच्या मागे कोणतीतरी शक्ती होती, हे लोक असे नाहीत असं सांगतानाच अजित पवार यांनी हा प्रकार म्हणजे पोलीस यंत्रणेचं अपयश असल्याचे नमूद केले आहे. कालच्या घटनेबाबत खूप काही माझ्या कानावर आलंय, असा दावा अजित पवार यांनी शनिवारी बोलताना केला आहे. “कालच्या घटनेबाबत खूप काही कानावर आलं आहे. पण त्याबाबत वास्तव परिस्थिती समोर आल्याशिवाय आम्ही बोलणं योग्य ठरणार नाही. जे कुणी आले होते, ते सगळे सुस्थितीत होते, अशातला भाग नाही. काही वेगळ्या गोष्टी देखील तिथे घडत होत्या”, असं अजित पवार म्हणाले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.