हे स्वत:ला समजतात ‘अत्रे’, ‘बाळासाहेब’!

140

मंगळवारी ठाण्यात राज ठाकरेंची उत्तर सभा झाली. या उत्तर सभेत राज ठाकरेंनी त्यांच्यावर केल्या गेलेल्या टीकांचा समाचार घेतला. तसेच, राज्य सरकारला मशिदींवरील भोंगे खाली उतरवण्यासाठी 3 मे पर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे. या सभेत ठाकरेंनी राऊतांच्या शिवराळ भाषेवर सडकून टीका केली. आता बुधवारी संजय राऊतांनी पत्रकार परिषद घेत, म्हणाले की मी दिलेल्या शिव्या हा माझ्या तोंडून निघालेला अंगार आहे. आचार्य अत्रेंपासून ते बाळासाहेबांपर्यंत सगळ्यांनी शिवराळ भाषेचा वापर केला आहे, असे म्हणत राऊतांनी आपल्या शिवराळ भाषेचे समर्थन केले आहे.

हा वाजतोय तो भाजपचाच भोंगा आहे

मी काल बोललो ना, की विझणारा दिवा मोठा होतो. मनसेची तिच स्थिती आहे. महाविकास आघाडीसोबत जे लोक समोरासमोर लढू शकत नाहीत. ते ईडी वगैरेच्या धमक्या देतात. दीड वर्षापर्यंत या पार्टीचा भोंगा बंद होता. आता अचानक हा भोंगा सुरु झाला आहे. हिंदुत्व शिवसेनेच्या नसानसांत आहे. राज्य सरकारला अल्टीमेटम कोणी देत नाही. अल्टीमेटम देण्याची ताकद फक्त बाळासाहेबांमध्येच होती. बाळासाहेबांनी या देशातील अतिरेक्यांना अल्टिमेटम दिला होता. हा जो भोंगा आहे तो भाजपचाच भोंगा आहे. नैराश्येतून हे भोंगे वाजत आहेत,असे म्हणत राऊतांनी राज ठाकरेंना भाजपाचा भोंगा म्हटले आहे.

मुख्यमंत्र्यांनीही शिवराळ भाषेचे केले समर्थन

संजय राऊत हे शिवराळ भाषा बोलतात. हे बरोबर आहे. मी ज्या संदर्भात शिवराळ भाषा वापरली त्याबाबत काल कौतुक व्हायला हवं होतं, कारण ते मराठी अभिमानी म्हणून कालपर्यंत मिरवत होते. मराठीच्या अस्मितेचे, मराठी माणसाच्या स्वाभिमानाचे आम्हीच एकमेव तारणहार आहोत. शिवसेना नाही. अशी भूमिका घेऊन ते राजकारणात आले आहेत. त्यामुळे त्यांनी काल माझ्या शिवराळ भाषेचे अभिनंदन केले असते किंवा शिवसेनेला पाठिंबा दिला असता, तर त्यांचे खरे मराठी प्रेम काल दिसले असते. किरीट सोमय्या या माणसासाठी मी शिवराळ भाषा वापरली आहे आणि मला त्याचा अभिमान आहे, उद्धव ठाकरेंनी आपल्या या शिवराळ भाषेचे समर्थन केल्याचेही संजय राऊत यावेळी म्हणाले. मराठी भाषा सक्तीची असू नये म्हणून हा माणूस न्यायालयात गेला होता त्याच्याविषयी मी शिवराळ भाषा वापरली, असं म्हणत राऊतांनी शिवराळ भाषेचे समर्थन केले आहे.

( हेही वाचा: आता एकाच वेळी व्हा दोन शाखांचे पदवीधर! )

मला मराठी जनता माफ करेल

मुंबई महाराष्ट्रापासून तुटावी. मुंबईवर मराठी माणसाचा हक्क राहू नये म्हणून काही कारस्थानं सुरु आहेत. त्याचा सूत्रधार हा किरीट सोमय्या आणि भारतीय जनता पक्षाच्या संदर्भात काही व्यावसायिक आहेत. म्हणून माझ्या तोंडून शिव्या निघाल्या, मराठी जनता मला यासाठी माफ करेल आणि मला उत्तेजन देईल. हा माझ्या तोंडातून निघालेला अंगार आहे. माझ्या शिवराळ भाषेवर तुम्ही जरुर टीका करा. तुमची जर भूमिका बदलली असेल, तर तुम्ही या किरीट सोमय्याला तुमच्या शिवतीर्थ बंगल्यावर बोलवा आणि त्याचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करा, अशा शब्दांत राऊत यांनी ठाकरेंवर टीका केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.