‘शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र आले तर…’, पवारांच्या विधानावर मुख्यमंत्री म्हणतात

123

बुधवारी गुरुपौर्णिमेनिमित्त राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दादर येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारकाला आणि ठाण्यातील आनंद दिघे शक्तीस्थळाला भेट देत त्यांना अभिवादन केले. आपण बाळासाहेब आणि आनंद दिघे यांच्या आशीर्वादांमुळेच मुख्यमंत्री झालो असल्याची प्रतिक्रिया यावेळी एकनाथ शिंदे यांनी दिली. पण शरद पवार यांनी केलेल्या एका विधानावर मात्र आपल्याला कोणतंही राजकारण नको असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे.

राजकारण नको…

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्ष एकत्र आले तर राज्यात एक वेगळंच चित्र पहायला मिळेल, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले. त्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार हे मोठे नेते आहेत, त्यामुळे त्यांच्याबाबत आम्हा सर्वांनाच आदर आहे. पण शिवसेनेतील जे 50 आमदार आज एकत्र आले आहेत, ते हिंदुत्वाच्या भूमिकेतून एकत्र आले आहेत. आता विविध जिल्ह्यांतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील आमच्यासोबत येत आहेत. त्यामुळे आता आम्हाला दुसरं कुठलंही राजकारण करायचं नसून, राज्याचा सर्वांगीण विकास करणं हेच आमचं अंतिम ध्येय्य असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

(हेही वाचाः सरकार बदललं तरी मी पद सोडणार नाही, चाकणकर स्पष्टच म्हणाल्या)

उल्हासनगरचे नगरसेवक शिंदे गटात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत शिवसेनेच्या आमदारांनी केलेल्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडली आहे. त्यानंतर शिवसेनेतील अनेक जिल्ह्यांतील पदाधिकारी, नगरसेवक हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी होताना दिसत आहेत. ठाणे, नवी मुंबईनंतर आता उल्हासनगर महापालिकेतील 15 हून अधिक नगरसेवकांनी शिंदे गटाला आपले समर्थन दिले आहे. तसेच दिंडोरी आणि नाशिक इथल्या शिवसेनेचे नगरसेवक आमच्या पाठिशी असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.