गडचिरोलीतील आरमोरी भागांत चार दिवसांत दुस-यांदा वाघाचा हल्ला, एक व्यक्ती ठार

134

गडचिरोलीतील आरमोरी तालुक्यातील वडसा विभागातील गावात पुन्हा वाघाच्या हल्ल्यात माणूस ठार झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. आरमोरीत चार दिवसांत दुस-यांदा वाघाचा हल्ला झाला आहे. याआधी गेल्या आठवड्यात शुक्रवारी वाघाच्या हल्ल्यात माणसाचा बळी गेला होता. मात्र दोन्ही हल्ल्यातील वाघाची माहिती कॅमे-याच्या माध्यमातून अद्यापही मिळालेली नसल्याची माहिती वनविभागाने दिली.

वन्यजीव अभ्यासकांना चिंता

सोमवारच्या घटनेतील ३५ वर्षीय इसम पालापाचोळा गोळा करण्यासाठी सकाळी साडेसहाच्या सुमारास जंगलात गेला होता. त्यावेळी वाघाने इसमावर हल्ला केला. मृतकाचे नाव पुरुषोत्तम सावसागडे असल्याचे बोलले जात आहे. ऐन पावसाळ्यात तसेच ऑक्टोबर महिन्यांत पावसाचा मुक्काम वाढलेला असताना वाघाचे वाढते हल्ले याबाबत वन्यजीव अभ्यासकांनी चिंता व्यक्त केली आहे.

(हेही वाचा मिठी नदीत मगरीचा वावर)

माणसांवर हल्ले करणारा नवा वाघ कोणता?

वडसा येथे गेल्या काही महिन्यांपासून सिटी १ या वाघामुळे स्थानिकांमध्ये घबराहटीचे वातावरण आहे. चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली आणि भंडारा जिल्ह्यात या वाघाचा वावर आहे. परंतु गडचिरोलीतील वडसा येथे वाघाचा वावर सुरु होताच जंगलात गेलेल्या माणसांवर सिटी १ चा हल्ला होत आहे. सिटी १ ने आतापर्यंत १२ जणांचा बळी गेला आहे. शुक्रवारपासून सिटी १ वडसा येथून गायब आहे. वडसा येथील टी ६ वाघीणही माणसांवर हल्ले करु लागली आहे. आतापर्यंत या वाघाणीने अंदाजे पाच जणांचा बळी घेतला आहे. अशातच सोमवारच्या घटनेत घटनास्थळापासून टी ६ ही वाघीणही लांब असल्याचे कॅमेरा ट्रेपच्या माध्यमातून वनाधिका-यांच्या लक्षात आले. दोन्ही हल्लेखोर वाघ घटनास्थळापासून गायब असताना शुक्रवारी आणि सोमवारी माणसांवर हल्ले करणारा नवा वाघ कोणता, याचा उलगडा अद्यापही होऊ शकलेला नाही. सिटी १ किंवा टी ६ या दोघांपैकी एक वाघ तातडीने पकडण्यासाठी वनाधिका-यांची टीम चांगलीच पणाला लागली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.