डोळे येण्याच्या साथीचा प्रादुर्भाव जोरात: कशी ओळखाल नेत्र संसर्गाची लक्षणे

157

मागील २ आठवड्यांपासून मुंबईमध्ये नेत्र संसर्गाचे (डोळे येणे) (conjunctivitis) रुग्ण वाढत आहेत. महानगरपालिकेच्या मुरली देवरा मनपा नेत्र रुग्णालयामध्ये मागील १५ दिवसांत सुमारे २५० ते ३०० नेत्र संसर्ग बाधित रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये विनामूल्य निदान आणि उपचार पुरवले जात असून नेत्र संसर्ग प्राथमिक लक्षणे जाणवू लागतात तातडीने उपचार करून घ्यावेत, असे नम्र आवाहन कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी केले आहे.

नेत्र संसर्ग बाधित रुग्ण आढळून लागल्याने  मुंबई महानगरपालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी मुंबईतील नागरिकांना योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन करताना डोळे आले असतील अशा वेळी डोळ्यांना सतत हात लावू नये, असे सांगितले आहे. डोळ्यांना स्वच्छ पाण्याने वारंवार धुत रहावे. डोळे पुसण्यासाठी स्वच्छ रुमालाचा उपयोग करावा आणि डोळ्यांना वारंवार स्पर्श करू नये. कुटुंबातील अन्य सदस्यांना संसर्ग होऊ नये म्हणून नेत्र संसर्ग असेपर्यंत कुटुंबापासून वेगळे तथा सुरक्षित अंतर राखून रहावे. तसेच कोणत्याही प्रकारचा घरगुती उपाय न करता, वैद्यकीय तज्ञांचा अथवा नेत्र उपचार तज्ञांचा सल्ला घ्यावा. त्यांच्या सल्ल्यानेच उपचार आणि औषधी घ्याव्यात. योग्य वेळेवर उपचार घेतल्यावर ५ ते ६ दिवसांत डोळे बरे होतात, असे सांगितले.

एकदा डोळे आल्यानंतर पुन्हा होऊ शकतो संसर्ग

एकदा डोळे येऊन गेले की, परत त्या व्यक्तीला संसर्ग होत नाही, असे नाही. एकदा नेत्र संसर्ग होऊन बरे होऊनही पुन्हा त्या व्यक्तीस संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे निष्काळजीपणा करणे योग्य नाही. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये विनामूल्य निदान आणि उपचार पुरवले जातात. नेत्र संसर्ग प्राथमिक लक्षणे जाणवू लागतात तातडीने उपचार करून घ्यावेत, असे नम्र आवाहन पुन्हा एकदा महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे.

( हेही वाचा: अंधेरी पोटनिवडणूक: केंद्रीय निवडणूक निरीक्षकांनी घेतला निवडणुकीचा आढावा )

डोळयाची साथ कशी पसरते

पावसाळ्यात हवेतील दमटपणा वाढला की वातावरण संसर्गजन्य रोगांसाठी पोषक ठरते. त्यामुळे दरवर्षी या दिवसात इतर आजारांबरोबर नेत्र संसर्ग अर्थात डोळे येण्याची साथ पसरते,असे मुरली देवरा मनपा नेत्र रुग्णालयाच्या प्रमुख वैद्यकीय अधिकारी वर्षा रोकडे यांनी नेत्र संसर्गाच्या लक्षणाची माहिती देताना सांगितले. नेत्र संसर्गाच्या साथीमध्ये सुरुवातीला एका डोळ्याला संसर्ग होतो, त्यानंतर दुस-या डोळ्यालादेखील संसर्ग होतो.

साथीच कारण विषाणूजन्य

डोळ्यात काहीतरी गेल्यासारखे वाटते आणि सतत डोळ्यांमधून पाणीदेखील येते. डोळे लाल होतात. काही वेळा डोळ्यातून चिकट द्रव पदार्थ बाहेरील बाजूस येत असतो. तसेच डोळ्यांना आतील बाजूस सूज येते. डोळ्यांना खाज येते. डोळे जड वाटतात आणि तीव्र प्रकाश सहन होत नाही. या प्रकारच्या संसर्गामुळे काही लोकांना तापदेखील येतो. सध्या या साथीचे कारण विषाणूजन्य आहे, असे आढळून येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.