राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र, केली महत्वाची मागणी

115

परतीच्या पावसामुळे राज्यातील रब्बी पिकांचे नुकसान होत आहे. या पिकांच्या काढणीचा हंगाम सुरू झाल्यामुळे पावसाचा फटका या पिकांना बसून त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. त्यामुळेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून एक मागणी केली आहे. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करुन शेतक-यांना दिलासा द्यावा अशी मागणी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

दिवाळी तोंडावर आली असताना परतीच्या पावसामुळे शेतीचे फार मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे राज्य सरकारने याबाबत युद्धपातळीवर आढावा घेऊन उपाययोजना कराव्यात आणि राज्यात ओला दुष्काळ जाहीर करुन शेतक-यांना मदत करावी अशी मागणी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे केली आहे.

राज ठाकरे यांची मागणी

यावर्षी मान्सून पावसाचा मुक्काम राज्यात लांबला, त्यामुळे खरीप पिकांचे आतोनात नुकसान झाले. त्यात परतीच्या पावसाने कहर केल्यामुळे रब्बी हंगामाचीही शेतक-यांना चिंता सतावत आहे. त्यामुळे सरकारने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले असून ती चांगली गोष्ट आहे. पण तेवढं करुन पुरेसं होणार नाही, त्यामुळे शेतक-यांचं नुकसान भरुन काढण्यासाठी ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे.

शेतक-यांची दिवाळी आनंदात व्हावी

तसेच दिवाळी हा आनंदाचा सण येत आहे. लॉकडाऊनच्या संकटानंतर शेतकरीही दिवाळी उत्साहाने साजरा करण्यासाठी आतूर आहे. त्यामुळे त्याचीही दिवाळी आनंदात साजरी होईल याकडे राज्य सरकारने लक्ष द्यावे अशी विनंतीही राज ठाकरे यांनी पत्रातून केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.