नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्रात आगीचे सत्र सुरु झाले की काय, असे वाटावे, अशा घटना घडत आहेत. कारण नाशिक येथे जिंदाल कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली, ही आग आटोक्यात येत नाही तोच आता बार्शी येथे आग आली आहे. जिल्ह्याच्या बार्शी तालुक्यातील शिराळे-पांगरी हद्दीत असलेल्या शोभेच्या दारू कारखान्यात नववर्षाच्या पहिल्या दिवशी मोठा स्फोट झाला. या स्फोटात प्राथमिक माहितीनुसार पाच जण मयत झाले असून २० ते २५ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पाच ते दहा किलोमीटर अंतरापर्यंत स्फोटाचा आवाज ऐकू आला
या अपघातात मयताचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविली आहे. बार्शी तालुक्यातील शिराळे-पांगरी हद्दीत शोभेच्या दारूचा कारखाना आहे. याठिकाणी फटाके, दारूगोळे तयार करण्यात येतात. याठिकाणी रविवार, १ जानेवारी २०२३ रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास अचानक स्फोट झाला. या स्फोटाचा आवाज एवढा मोठा होता की, किमान पाच ते दहा किलोमीटर अंतरापर्यंत या स्फोटाचा आवाज ऐकू आल्याचे सांगण्यात आले. बार्शीतील अग्निशामक यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. जखमींना उपचारासाठी रूग्णालयात नेण्यात येत आहे. कारखान्यातून आगीचे लोट मोठ्या प्रमाणात येत असल्याने बचावकार्यास अडचणी निर्माण येत आहेत.
(हेही वाचा काश्मिरी पोलिसांसाठी वर्ष २०२२ गेले शांतीपूर्ण; २०२३ चे लक्ष्य काय असणार?)