कारागृहात अत्याधुनिक शेतीतून पिकवणार फळभाज्या

110

राज्यातील कारागृहात शिक्षा भोगत असणाऱ्या कैद्यांमध्ये सुधारणा आणि त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी त्यांना विविध उद्योगात गुंतवले जाते. त्यापैकी महत्त्वाचा उपक्रम म्हणजे शेतीकाम. कारागृहात पिकवण्यात येणाऱ्या फळभाज्या, भाजीपाला हा राज्यातील कारागृहात वापरला जातो.

( हेही वाचा : शिवडी न्यायालयाकडून नवनीत राणांचे वडील फरार घोषित)

शेतीचे उत्पादन वाढविण्यासाठी राज्यातील दहा कारागृहात अत्याधुनिक शेती करण्यात येणार असून त्यासाठी शासनाने अत्याधुनिक उपकरणे व अवजारे खरेदीसाठी मंजुरी दिली असून त्यासाठी १७ लाख १६ हजार रुपये मंजूर करण्यात आले आहे. यापुढे राज्यातील कारागृहात अत्याधुनिक पद्धतीने शेती करण्यात येणार असून त्यातून मोठे उत्पादन काढले जाणार आहे.

शिक्षा झालेल्या कैद्यांचे ‘सुधारणा व पुनर्वसन’ हे कारागृहाचे ब्रीद वाक्य आहे. त्यानुसार राज्यातील कारागृहात कैद्यांना विविध कामात गुंतवून ठेवले जाते. राज्यात लहान मोठे, खुले अशी एकूण ४७ कारागृहे आहेत, त्यापैकी ९ खुली आणि ९ मद्यवर्ती कारागृह आहे. नाशिक, येरवडा, कोल्हापूर येथील कारागृहात हातमाग, यंत्रमाग,सुतार काम, चर्मकला, लोहारकाम, बेकरी उत्पादने इत्यादीचे कारखाने आहेत. या कारखान्यामध्ये कुशल, अर्धकुशल कैद्यांकडून विविध उत्पादने तयार करून त्यांची बाजारात विक्री केली जाते. त्यातून येणाऱ्या उत्पन्नातून कारागृह प्रशासनाच्या नियमानुसार कैद्यांना पगार दिला जातो.

राज्यातील दहा कारागृहात असलेली शेकडो एकर जमीन कारागृहाच्या मालकीची आहे. या जमिनीवर शेती करण्यात येते. शेतीतील उत्पादन वाढविण्यासाठी अत्याधुनिक पद्धतीने शेती करण्यासाठी अत्याधुनिक अवजारे आणि उपकरणे खरेदी करण्यासाठी कारागृह प्रशासनाने गृहविभागाकडे केलेली मागणी मान्य करण्यात आली आहे. शासनाने अत्याधुनिक शेतीसाठी लागणाऱ्या अवजारांसाठी खरेदी प्रक्रिया मंजूर करून एकूण १७ लाख १६ हजार रुपये अवजारे खरेदीसाठी मान्य केली आहेत. नाशिक, येरवडा, विसापूर, कोल्हापूर, पैठण खुले कारागृह, नागपुर खुले कारागृह, मोर्शी, आदी कारागृहांसाठी शेतीसाठी लागणारी अत्याधुनिक अवजारे खरेदी करण्यात येणार आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.