सांताक्रूझ येथील कापड व्यावसायिकाच्या हत्येत अटक करण्यात आलेल्या आरोपीच्या चौकशीत नवीन खुलासा समोर आला आहे.कापड व्यावसायिक कमलकांत शहा यांच्या खाद्यपदार्थात मिसळण्यात आलेले थेलीयम हा विषारी धातू पंजाब राज्यातून आणण्यात आला असल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. गुन्हे शाखेचे एक पथक पंजाबमध्ये तपासासाठी रवाना झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
( हेही वाचा : समृद्धी महामार्गावरील ब्रिजने अडवली ट्रकची वाट… )
सांताक्रूझ पश्चिम येथील कापड व्यावसायिक कमलकांत शहा (४६) यांना अन्न पदार्थांतून त्याची पत्नी काजल आणि तिचा प्रियकर हितेश जैन हे जून महिन्यांपासून आर्सेनिक आणि थेलियम हे विषारी धातू देत होते. ऑगस्ट महिन्यात या विषारी धातूचे परिणाम समोर येऊ लागले, या विषारी धातूने कमलकांत यांच्या शरीरातील संपूर्ण अवयव निकामी केले. १९ सप्टेंबर रोजी कमलकांत यांचा मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात मृत्यु झाला होता. याप्रकरणी १डिसेंबर रोजी मुंबई गुन्हे शाखा कक्ष ९ ने हत्या, पुरावानष्ट करणे, विषारी द्रव्य देणे याप्रकरणी पत्नी काजल आणि तिचा प्रियकर हितेश जैन या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.
या दोघांच्या चौकशीत दररोज नवनवीन खुलासे करण्यात येत आहेत. त्यात त्यांनी आर्सेनिक आणि थेलियम या विषारी धातूचा शोध घेण्यासाठी गुगल सर्च इंजिनचा वापर केल्याचे समोर आले, व थेलियम हा विषारी धातू हितेश जैन पंजाब राज्यातून घेऊन आला होता. हे विष काजलच्या ताब्यात देण्यात आले अन्नात किती प्रमाणात विषमात्रा मिसळायची हे काजलला सांगितले होते अशी माहिती या दोघांच्या चौकशीत समोर आली आहे. गुन्हे शाखेचे एक पथक थेलियम हे विष खरेदी केलेल्या ठिकाणी पंजाब राज्यात रवाना झाले असून ज्या ठिकाणाहून हा विषारी धातू आणण्यात आला तेथील व्यक्तीचा जबाब नोंदविण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
Join Our WhatsApp Community