अँटिलिया आणि मनसुख हिरेन हत्याकांडाचे धागेदोरे नेपाळपर्यंत पोहचले

86

अँटिलिया आणि मनसुख हिरेन हत्याकांडांच्या तपासासाठी एनआयएचे अधिकारी नेपाळ राष्ट्रात जाणार आहेत. या गुन्ह्यातील काही पुरावे नेपाळमध्ये असल्याची माहिती एनआयएच्या हाती लागली असून एनआयएने न्यायालयाकडून नेपाळला तपासासाठी जाण्याची परवानगी मिळवली असल्याची माहिती समोर येत आहे.

अँटिलिया स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्याकांडातील आरोपींपैकी संतोष शेलार, सतीश मोठुकुरी आणि मनीष सोनी हे तिघे मनसुख हिरेन याच्या हत्याकांडानंतर दिल्ली येथून नेपाळ येथे गेले होते, नेपाळमध्ये काही दिवस मुक्काम केल्यानंतर हे तिघे दुबई येथे गेले होते. या दरम्यान या हत्याकांडातील काही महत्वाचे पुरावे नेपाळ राष्ट्रात ठेवल्याची माहिती एनएआयएच्या तपासात समोर आली. या गुन्ह्याचे धागेदोरे नेपाळपर्यंत असल्यामुळे हे पुरावे या खटल्यासाठी महत्वाचे ठरणार आहे.

(हेही वाचा रामनवमीच्या दिवशी उद्धव ठाकरे म्हणाले, धनुष्यबाण चोरला असला, तरी…’)

हे पुरावे गोळा करण्यासाठी व इतर तपासासाठी नेपाळला जाण्यारकता एनआयएने न्यायालयाकडे परवानगी मागितली होती. २५ फेब्रुवारी २०२१ रोजी अँटिलियाच्या बाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी पार्क केल्याच्या आरोपाखाली नोंदवलेल्या खटल्यातील तीन आरोपींचा मुक्काम नेपाळमध्ये असून त्याच्या तपासासाठी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) नेपाळ सरकारला पत्र पाठवले. यासंबंधी एनआयएने मंगळवारी विशेष एनआयए न्यायालयात नेपाळमध्ये तपासासाठी जाण्याकरता परवानगी मागितली. या याचिकेला अनुमती देताना न्यायालयाने केंद्र सरकारला सक्षम अधिकाऱ्याला पाठवण्याचे आदेश दिले आणि त्या बदल्यात पुरावे गोळा करून ते विशेष न्यायालयाला सादर करण्यास सांगितले जाईल.

उद्योगपती अनिल अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील अँटिलिया या आलिशान घराजवळ २५ फेब्रुवारी २०२१ रोजी स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ मोटार आढळून आली होती, या मोटारीचा मालक ठाण्यातील व्यावसायिक मनसुख हिरेन याचा मृतदेह ४ मार्च रोजी मुंब्रा खाडीत आढळून आला होता, मनसुख हिरेन यांची हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आणि या प्रकरणात मुंबई पोलीस दलातील बडतर्फ अधिकारी सचिन वाझे, एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा, पोलीस निरीक्षक सुनील माने, काझी, यांच्यासह ९ जणांना अटक करण्यात आली होती. यापैकी संतोष शेलार, सतीश मोठुकुरी आणि मनीष सोनी हे तिघे मनसुख हिरेन हत्याकांडानंतर नेपाळ येथे पळून गेले होते, त्या ठिकाणी काही दिवस मुक्काम केल्यानंतर हे तिघे दुबई येथे निघून गेले होते. या प्रकरणाचा तपास एनआयए करीत असून या खटल्याचे दोषारोप पत्र न्यायालयात सादर करण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.