Vasai Murder Case : पोलिसांत तक्रार दिल्याच्या रागातून घडले वसईतील हत्याकांड; ८ दिवसांपासून हल्लेखोर होता आरतीच्या मागावर

152
Vasai Murder Case : पोलिसांत तक्रार दिल्याच्या रागातून घडले वसईतील हत्याकांड; ८ दिवसांपासून हल्लेखोर होता आरतीच्या मागावर

आरती यादव या तरुणीने रोहित विरोधात ८ जून रोजी आचोळे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी रोहित विरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करून त्याला समज देऊन सोडून देण्यात आले होते. तेव्हाच रोहितने आरतीला संपविण्याचा निर्णय घेतला होता असे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. मंगळवारी वसई येथे भररस्त्यात घडलेल्या आरती यादव हत्याकांड प्रकरणी अटक करण्यात आलेल्या रोहित यादवला बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने २४ जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. (Vasai Murder Case)

नालासोपारा येथे राहणाऱ्या आरती यादव (२०) या तरुणीची वसई येथे भररस्त्यात डोक्यात लोखंडी पान्याने प्रहार करून हत्या करण्यात आली. हे हत्याकांड मंगळवारी दुपारी भररस्त्यात दिवसाढवळ्या शेकडो जणांच्या समोर घडत होते, ही घटना बघणाऱ्यांपैकी अनेकजण आपल्या मोबाईल फोनच्या कॅमेरात या हल्ल्याचे दृश्य कैद करीत होते. परंतु हा हल्ला रोखण्यासाठी किंवा या तरुणीला हल्लेखोराच्या तावडीतून सोडविण्याचा साधा प्रयत्नही कोणी केला नाही. हल्ल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेल्या या तरुणीच्या शेजारी हल्लेखोर बराच वेळ बसून होता, त्याच्या हातात लोखंडी पाना होता, पाठीवर बॅग होती हा सर्व प्रकार अनेकांनी आपल्या मोबाईल कॅमेरात कैद करून हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. हल्ल्याच्या बराच वेळानंतर वालीव पोलीस घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी जखमी आरती यादवला तात्काळ उपचारासाठी सरकारी रुग्णालयात पाठवले व हल्लेखोराला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणण्यात आले. दरम्यान रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलेल्या आरती यादव या तरुणीला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. (Vasai Murder Case)

(हेही वाचा – Vasai Murder ने करुन दिली रिंकू पाटील हत्याकांडाची आठवण; मुंबई ठाण्यात खळबळ उडवून देणाऱ्या तीन हत्या)

वालीव पोलिसांनी याप्रकरणी ताब्यात घेतलेल्या तरुणाविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव रोहित यादव असे असून त्याचे आरती यादव सोबत दोन वर्षांपासून प्रेमप्रकरण होते. रोहित यादवने आरतीला खोटे सांगितले होते की, तो उच्च शिक्षित असून फिल्म स्टुडिओमध्ये नोकरी करीत आहे. परंतु आरतीला त्याच्याबद्दल खरं समजले की रोहितचे शिक्षण ८ वी पर्यंत झाले आहे व त्याची नोकरी देखील तात्पुरती आहे, त्यानंतर आरती त्याला टाळू लागली होती. आरतीच्या आयुष्यात दुसरा तरुण आल्यामुळे ती आपल्याला टाळत आहे असा रोहितला संशय होता. (Vasai Murder Case)

गेल्या आठवड्यात ८ जुन रोजी रोहितने आरतीला वाटेत अडवले व तिच्यासोबत तो गैरवर्तन करू लागल्याने आरतीने आचोळे पोलीस ठाण्यात रोहितविरुद्ध तक्रार दाखल केली होती. आचोळे पोलिसांनी रोहितविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेऊन समज देऊन सोडले होते. आरतीने त्याच्या विरोधात दिलेल्या तक्रारीने रोहित हा संतापला होता आणि त्याने आरतीला कायमची अद्दल घडविण्याचे ठरवले. एका कंपनीतून त्याने लोखंडी पाना घेतला होता व तो पाना त्याने आपल्या बॅगेत ठेवून आरतीला अद्दल घडविण्याची संधी शोधत होता. मंगळवारी सकाळी ती वसई गावराई पाडा येथील कंपनीत कामाला जात असताना रोहितने सकाळी तिला अडवून तिच्या डोक्यावर या लोखंडी पान्याने १६ वार करत तिची हत्या केली असे पोलिसांनी केलेल्या तपासात समोर आले. (Vasai Murder Case)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.