भारत-चीनमध्ये 13वी लष्करी बैठक संपन्न! काय झाले चर्चेत? वाचा

एलएसीच्या बाबतीत असलेल्या समस्येवर चीनच्या एकतर्फी कुरघोड्यांमुळे आणि द्विपक्षीय करारांचे उल्लंघन केल्यामुळे, ही परिस्थिती उद्भवल्याचं भारतानं स्पष्ट केलं आहे.

87

भारत आणि चीनमध्ये एलएसी तसेच पूर्व लडाखमधील तणावाच्या स्थितीवर तेरावी बैठक नुकतीच संपन्न झाली. या बैठकीदरम्यान ब-याच मुद्द्यांवर दोन्ही बाजूने सहमती न झाल्याने चर्चा विफल ठरली आहे. तेराव्या फेरीची चर्चा रविवारी संध्याकाळी 7 वाजता चीनच्या मोल्दो चौकीत संपली.

बैठकीत भारताने मांडली बाजू

भारतीय पक्षाकडून उर्वरित क्षेत्रांचे निराकरण करण्यासाठी विधायक सूचना बैठकीदरम्यान केल्या गेल्या. परंतु चिनी पक्षाकडून या मुद्द्यांवर सहमती नव्हती. तसेच त्यांच्याकडे कोणतेही दूरगामी प्रस्ताव मांडण्यात आले नाहीl. त्यामुळे या बैठकीत उर्वरित क्षेत्रांचे निराकरण झाले नाही, असे भारतीय लष्कराने सोमवारी सांगितले. बैठकीदरम्यान, दोन्ही बाजूंकडून झालेल्या चर्चेत पूर्व लडाखमधील एलएसीसह उर्वरित समस्यांचे निराकरण करण्यावर चर्चा झाली. या बैठकीत भारताने आपले मुद्दे मांडले. एलएसीच्या बाबतीत असलेल्या समस्येवर चीनच्या एकतर्फी कुरघोड्यांमुळे आणि द्विपक्षीय करारांचे उल्लंघन केल्यामुळे, ही परिस्थिती उद्भवल्याचं भारतानं स्पष्ट केलं आहे.

(हेही वाचाः चीनकडून पाकला गोंजारणे सुरुच! भारताविरुद्ध कारवायांसाठी पाकला अशी केली जात आहे मदत)

शेवटी तोडगा नाहीच

एलएसीच्या भागांत शांतता पुनर्स्थापित करण्यासाठी चीनच्या बाजूने उर्वरित भागात योग्य पावले उचलणे आवश्यक होते. दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांच्याच आधारे ही बैठक घेण्यात आली होती. नुकत्याच पार पडलेल्या या बैठकीत दोन्ही देशांनी लवकरात लवकर समस्यांवर तोडगा काढणे अपेक्षित होते. तशी सहमतीही दोन्ही देशांनी दर्शवली होती, पण प्रत्याक्षात मात्र तसे झाले नाही.

चीनने भारतालाच ठरवलं दोषी

पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए)च्या वेस्टर्न थिएटर कमांडने सोमवारी सकाळी या बैठकीत काही निर्णय न झाल्याने भारतालाच दोष दिला आहे. लष्करी कमांडर्सच्या बैठकीचा संदर्भ देत, पीपल्स लिबरेशन आर्मीच्या वेस्टर्न थिएटर कमांडचे प्रवक्ते वरिष्ठ कर्नल लॉन्ग शाहुआ यांनी सोमवारी दावा केला की, चिनच्या बाजूने सीमेच्या वादांवर परिस्थिती सुलभ आणि सामान्य करण्यासाठी खूप प्रयत्न केले गेले. द्विपक्षीय लष्करी संबंधांचे एकूण हितसंबंध जपण्याचा चीनने प्रामाणिकपणाने प्रयत्न केला.

(हेही वाचाः चीन-पाकची भारताविरुद्ध ‘ही’ आहे नवी चाल)

भारताच्या बाजूने मात्र अजूनही अवाजवी आणि अवास्तव  मागण्या कायम असल्याने, निर्णय न होता अडचणी अधिक वाढल्याचा दावा चीनकडून करण्यात आला. या परिस्थितीचा गैरवापर करण्याऐवजी भारताने चीन-भारत सीमावर्ती भागातील कठीण परिस्थिती लक्षात घेऊन लवकरात लवकर यावर उपाय शोधण्यावर भर द्यायला हवा, असं पीएलएच्या प्रवक्त्याने सांगितलं.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.