नार्को टेररिझम  दहशतवादापेक्षाही  अधिक गंभीर! प्रवीण दीक्षित यांचे मत 

112

नार्को टेररिझम हा मोठा चिंतेचा आणि गंभीर विषय आहे. अंमली पदार्थांच्या या विळख्याने इतके गंभीर स्वरूप धारण केले आहे की, ते आता नेहमीच्या ज्ञात दहशतवादापेक्षाही अधिक धोकादायक बनले आहे. ईशान्य भारतातील दहशतवादाचा विचार करता तेथील दहशतवादी कारवायांमध्ये मरण पावलेल्यांपेक्षा अधिक मृत्यू या नार्को टेररिझमने झाले आहेत, भारत हा देश केवळ अंमली पदार्थांना अन्यत्र पोहचवण्यासाठी असलेले मध्यवर्ती ठिकाण वा ट्रान्झिशन राहिले नसून येथील युवा पिढीही अंमली पदार्थांच्या विळख्यात सापडत आहे, हा चिंतेचा विषय आहे, असे मत महाराष्ट्राचे निवृत्त पोलिस महासंचालक (डीजीपी) प्रवीण दीक्षित यांनी रविवारी व्यक्त केले.

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या स्ट्रॅटेजिक सेंटरने आयोजित केलेल्या ऑनलाइन संवादात ते बोलत होते. स्ट्रॅटेजिक सेंटरचे मानद संचालक ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त) यांनी दीक्षित यांच्याशी संवाद साधला. यावेळी बोलताना दीक्षित यांनी विविधांगी माहिती देत नार्को टेररिझमचे गांभीर्य लक्षात आणून दिले.

(हेही वाचा पठाणकोटमध्ये आर्मी कॅम्पच्या गेटजवळ ग्रेनेड स्फोट)

कमी किंमतीत अंमली पदार्थांची लागवड

लखनऊ येथे अलीकडेच सर्व राज्यांच्या पोलिस महासंचालकांची तसेच केंद्रीय निमलष्करी दलाच्या प्रमुख अधिकाऱ्यांची परिषद झाली. त्यात नार्को टेररिझम, अंमली पदार्थांची तस्करी, वाहतूक, तसेच दहशतवाद यावर चर्चा झाली. यामुळे नार्को टेररिझमचे गांभीर्य अधोरेखित झाले आहे, असेही ते म्हणाले. यावेळी दीक्षित यांनी गोल्डन ट्रँगल आणि गोल्डन क्रिसेन्ट या संबंधात माहिती देऊन पाकिस्तान, इराण आणि अफगाणिस्तान या गोल्डन ट्रँगलमध्ये असणारे अंमली पदार्थांचे उत्पादन आणि व्यवहार याची माहिती दिली. गरिबीमुळे गोल्डन क्रिसेन्टमधील या देशांमध्ये अंमली पदार्थांची निर्मिती होत असते. या ठिकाणी अतिशय कमी गुंतवणुकीत अंमली पदार्थांची लागवड होते. त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी किंमत मिळते. यातच या अंमली पदार्थांच्या व्यवहाराचे सारे गणित समजून येते, असेही दीक्षित म्हणाले.

भारताची युवापिढी बनतेय व्यसनाधीन 

भारत या साऱ्यामध्ये माल उतरून पुढे पाठवण्यासाठी असणारा भाग (ट्रान्झिशन) समजला जात असला, तरी देशातील मध्य प्रदेश, छत्तीसगड, आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये असणारी सुपीक जमीन या अंमली पदार्थांच्या लागवडीला उपयुक्त असून तेथूनही महाराष्ट्रात या अंमली पदार्थांची तस्करी होत असते. रस्ते, रेल्वेमार्ग येथून गांजा महाराष्ट्रात येत असतो, असेही त्यांनी सांगितले. महाराष्ट्र आणि देशात अंमली पदार्थ सेवन करण्याचे प्रमाण वाढले आहे, ही देखील चिंतेची बाब आहे. दहशतवादापेक्षाही अंमलीपदार्थांचा विळखा घातक आहे. युवकांना तो नष्ट करतो. देशाच्या विविध राज्यांमध्ये अंतर्गत भागातही हे दिसून येत आहे, असेही प्रवीण दीक्षित म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.