रशिया-युक्रेन तणाव : किती भारतीय परतले मायदेशी?

84

रशिया आणि युक्रेन यांच्यातील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकार युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांसह देशवासीयांना मायदेशी परत आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मंगळवारी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास एअर इंडियाच्या विमानाने २४२ जण सुखरूप मायदेशी परतले. परतलेल्या काही विद्यार्थ्यांनी तेथील तणावपूर्ण स्थितीची माहिती दिली. यामध्ये बहुतांश विद्यार्थ्यांनी सांगितले की, तणावपूर्ण स्थिती निर्माण झाल्याने आम्ही सुरक्षेच्या कारणास्तव मायदेशी परतलो.

एअर इंडियाचे बोईंग ७८७ या विमानाने दिल्लीहून मंगळवारी सकाळी ७.३० वाजता उड्डाण केले. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ३ वाजता बोरिस्पिल आंतरराष्ट्रीय विमानतळावर हे विमान उतरले. त्यानंतर विमानाने तेथील भारतीयांना घेऊन मायदेशी परतीचा प्रवास केला. युक्रेनमधून २४२ भारतीयांना घेऊन हे विमान मंगळवारी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले.

( हेही वाचा : युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी विशेष विमानसेवा! )

अतिरिक्त विमानांची होणार उड्डाणे

युक्रेनमधील भारतीय दुतावासाने दिलेल्या माहितीनुसार, युक्रेन आणि त्याच्या सीमेजवळील भागात सुमारे २० हजार भारतीय राहतात. त्या सर्वांना मायदेशी परत आणण्याचा भारत सरकारने निर्णय घेतला आहे. यानुसार विमानांचे नियोजन करण्यात येत आहे. युक्रेनच्या किवमधून दिल्लीपर्यंत अतिरिक्त विमानांची उड्डाणे केली जातील. यामध्ये २५ फेब्रुवारी, २७ फेब्रुवारी आणि ६ मार्चला विमानांची उड्डाणे होतील. याशिवाय २४ फेब्रुवारी आणि २६ फेब्रुवारीला बोरिस्पिल विमानतळावरून भारतासाठी विमानांची उड्डाणे होतील. अशी माहिती भारतीय दुतावासाने दिली आहे.

का निर्माण झाली तणावाची स्थिती

रशियाने युक्रेनच्या डोनेस्तक आणि लुगान्स्क या बंडखोरांचे वर्चस्व असलेल्या भागांना स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली आहे. यासोबतच रशियाच्या संसदेने राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना देशाबाहेरही सैन्य वापरण्याची परवानगी दिली आहे. तेव्हापासून येथे तणाव वाढला आहे. रशियाच्या या निर्णयानंतर अमेरिका आणि इतर अनेक पाश्चात्य तसेच युरोपीय देशांनी रशियावर आर्थिक निर्बंध जाहीर केले आहेत.

एअर इंडियाने बजावली महत्वाची भूमिका

याआधीही निर्माण झालेल्या अनेक आपत्कालीन परिस्थितींमध्ये एअर इंडियाने महत्वाची भूमिका बजावली आहे. कोरोना संकटात विदेशातील लाखो भारतीयांना एअर इंडियाने सुखरूप मायदेशी आणले आहे. १९९० मधील इराक-कुवेत युद्धापासून युद्धजन्य परिस्थिती असलेल्या अनेक देशांतील लाखो भारतीयांना एअर इंडियाने भारतात सुखरूप आणले आहे. इराक युद्धावेळी ५९ दिवसांत १० लाख भारतीयांना एअर इंडियाने मायदेशी आणले होते.

भारतीय दुतावासाने दिला युक्रेन सोडण्याचा सल्ला

युक्रेनमधून दिल्लीत परतलेल्या विद्यार्थिनी रियाने सांगितले की, युक्रेनमध्ये सध्या स्थिती सामान्य आहे. आम्ही दूतावासाने दिलेल्या सल्ल्याचे पालन केले. देशात परतल्यानंतर खूप आनंद होत आहे. युक्रेनमधील परिस्थिती बदलताच भारतीय दुतावासाने आम्हाला युक्रेन सोडण्यास सांगितले होते. त्यानंतर आम्ही भारतात आलो आहे. युक्रेनमध्ये वैद्यकीय अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्याने सांगितले की, मायदेशी परतून आता निवांत वाटत आहे. तर विद्यार्थी क्रिश राज म्हणाला, मी युक्रेनमध्ये सीमावर्ती भागापासून लांब राहत होतो. त्यामुळे तेथील परिस्थिती सामान्य होती. भारतीय दूतावासाने जारी केलेल्या निवेदनानंतर मी परत आलो.

हरियाणात राहणाऱ्या महिलेने आपली मुलगी युक्रेनमधून परतल्याने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. त्या म्हणाल्या, मुले सांगतात त्याप्रमाणे यावेळी परिस्थिती सामान्य होती. ते विद्यापीठात सुद्धा जात होते, पण रशिया आणि युक्रेनमधील तणाव सतत वाढत होता आणि इथल्या बातम्या बघून भविष्यात परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती वाटत होती. त्यामुळे सुरक्षितता लक्षात घेऊन आम्ही आमच्या मुलीला परत आणण्याचा निर्णय घेतला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.