भारतीय नौदलातील ८ निवृत्त अधिकारी कतारमध्ये बंदिस्त; कारण अद्याप अस्पष्ट

80

कतारमधील गुप्तचर अधिकाऱ्यांनी भारतीय नौदलातील ८ निवृत्त अधिकाऱ्यांना कैद करून ठेवले आहे. या अटकेला १२९ पूर्ण झाले असूनही भारत सरकार त्यांना अजूनही सोडवू शकले नाही. तसेच या अटके मागचे कारण अद्याप कतारही देऊ शकले नाही. पण भारत आणि कतारचे चांगले संबंध असूनही भारत या निवृत्त ८ अधिकाऱ्यांना का सोडवू शकले नाहीत, असे प्रश्न उपस्थितीत होत आहे.

नक्की काय घडले? 

भारतीय नौदलातील ८ निवृत्त अधिकारी कतारमधील त्यांच्या घरी झोपले होते. ३० ऑगस्ट २०२२ रोजी कतार गुप्तचर अधिकाऱ्यांरी घरात गेले आणि त्यांना अटक केली. मग त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी डांबून ठेवले. याची कल्पनाही निवृत्त अधिकाऱ्यांना नव्हती. माहितीनुसार, कतारच्या गुप्तचर संस्थेच्या राज्य सुरक्षा ब्युरोने ही अटक केली होती. पण त्यांच्यावर नेमके आरोप काय आहेत? हे मात्र अजूनही कतार सरकारने सार्वजनिक केलेले नाही.

मात्र सॉलिटरी कन्फाइन्मेन्टमध्ये पाठवल्याने त्यांना सुरक्षेशी संबंधित गुन्हात अटक केल्याचे म्हटले जात आहे. तसेच स्थानिक माध्यमांनुसार हे निवृत्त अधिकारी इस्त्रालयासाठी त्यांच्या देशाची हेरगिरी करत असल्याचा दावा केला आहे. पण त्यातही तथ्य नसल्याचे म्हटले आहे. परंतु १२९ दिवस उलटूनही अटकेत असलेल्या निवृत्त अधिकाऱ्यांसंबंधित भारत सरकारने कोणतेही पाऊल उचलेले दिसत नाहीये.

याबाबत साप्ताहिक ब्रीफिंगमध्ये परराष्ट्र मंत्रालायचे प्रवक्ते अरिंदम बाग म्हणाले की, ‘अजून निवृत्त अधिकाऱ्यांची सुटका का झाली नाही? हा प्रश्न खरंतरं कतारी अधिकाऱ्यांना विचारला पाहिजे. त्यांच्यावरील आरोपांबाबत माहिती कतारी अधिकाऱ्यांनी दिली नसल्याचे कुटुंबियांकडून सांगितले आहे. या अटकेबाबत कतारने भारताला कोणताही माहिती दिली नाहीये.’ दरम्यान गेल्या महिन्यात परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी हे प्रकरण संसदेत मांडून ही एक संवेदनशील बाब असल्याचे म्हटले होते. तसेच अधिकाऱ्यांची सुटका हे आमचे प्राधान्य असल्याचे सांगितले होते. शिवाय या प्रकरणासाठी राजदूत आणि वरिष्ठ अधिकारी कतार सरकारच्या संपर्कात असल्याचे म्हटले होते. पण संसद अधिवेशन होऊन एक महिना लोटूनही अधिकाऱ्यांच्या सुटकेबाबत काही चित्र नाहीये.

८ निवृत्त अधिकारी काय काम करत होते?

कॅप्टन नवतेज सिंग गिल, कॅप्टन सौरभ वशिष्ठ, कमांडर पूर्णेंदू तिवारी, कॅप्टन बिरेंद्र कुमार वर्मा, कमांडर सुग्नाकर पकाला, कमांडर संजीव गुप्ता, कमांडर अमित नागपाल, सेलर रागेश अशा प्रकारे अटक झालेल्या ८ निवृत्त अधिकाऱ्यांची नावे आहेत. हे अधिकारी दाहरा ग्लोबल टेक्नॉलॉजीज अँड कन्सल्टन्सी या खासगी कंपनीत काम करत होते. यामध्ये कतारी अमीर नेव्हल फोर्स म्हणजे QENFला प्रशिक्षण आणि इतर सेवा देण्याचे काम ते करत होते. याचे नेतृत्व स्क्वॉड्रन लीडर खामिस अल अजमिक करत होते. ८ भारतीय निवृत्त अधिकाऱ्यांसोबत अजमिक यांनाही अटक झाली होती. परंतु नोव्हेंबरमध्ये त्यांची सुटका करण्यात आली. त्यामुळे या ८ भारतीय निवृत्त अधिकाऱ्यांची अजूनही सुटका का झाली? असा सवाल सातत्याने उपस्थितीत केला जात आहे.

दरम्यान भारत आणि कतारने शिक्षा झालेल्या कैद्यांचे हस्तांतरण करण्याचा करार केला आहे. यामुळे कैदी कुटुंबियांना भेटू शकतील अशा ठिकाणी शिक्षा भोगू शकतील. परंतु हे प्रकरणी चाचणीपूर्व टप्प्यात आहे आणि कोणत्या आरोपाखाली ८ निवृत्त अधिकाऱ्यांना तुरुंगवास झाला आहे हे अस्पष्ट आहे.

या प्रकरणाबाबत भारतीय नौदलाचे माजी नौदल प्रमुख अॅडमिरल अरुण प्रकाश म्हणाले की, ‘कोणतेही स्पष्टीकरण न देता आपल्या नागरिकांना कोंडून ठेवणे हे अत्यंत चिंतेची बाब आहे. पण आमचे मुत्सद्दी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याची आम्हाला खात्री आहे.’

(हेही वाचा – भारताच्या प्रयत्नांना यश; २६/११च्या हल्ल्यात सामील असलेला अब्दुल रहमान मक्की आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.