Marathi Film : मराठी चित्रपट निर्मितीची दुर्दशा; आपण इतके मागे का पडलो?

241
Marathi Film : मराठी चित्रपट निर्मितीची दुर्दशा; आपण इतके मागे का पडलो?
Marathi Film : मराठी चित्रपट निर्मितीची दुर्दशा; आपण इतके मागे का पडलो?
भारतीय चित्रपटसृष्टी ही मराठी माणसाने निर्माण केली हे जितकं अभिमानास्पद आहे, तितकंच त्रासदायक हे आहे की आज दक्षिण भारतीय आणि इतर भाषिक चित्रपट जगाशी स्पर्धा करण्यासाठी सज्ज असताना मराठी चित्रपट (marathi film) मागे पडत चाललेत.
एक काळ होता जेव्हा मराठीमध्ये उत्तम दर्जाचे चित्रपट निर्माण होत होते. भालजी पेंढारकर, दादासाहेब फाळके, बाबुराव पेंढारकर, जब्बार पटेल, पु. लं. देशपांडे, प्रल्हाद केशव अत्रे, दादा कोंडके अशी अनेक प्रसिद्ध नावे सांगता येतील ज्यांनी मराठी चित्रपटाला सर्वोत्तम शिखरावर नेऊन ठेवले होते. मात्र त्यानंतर मराठी चित्रपट मागे मागे पडत गेला. दरम्यान सचिन पिळगावकर, महेश कोठारे अशा चित्रपट निर्मात्यांनी विनोदी चित्रपट निर्मित करुन मराठी सिनेसृष्ती टिकवून ठेवली. त्यानंतर मात्र मराठी चित्रपटाला (marathi film) उतरती कळा लागली.
श्वास चित्रपटाने पुन्हा एकदा आशेचा किरण दाखवला आणि सगळीकडे चर्चा होऊ लागली की, ’मराठी चित्रपटत आशयघन असतात.’ तेव्हा असे वाटले होते की पुन्हा एकदा मराठी चित्रपट उंच भरारी घेतील. श्वास नंतर मराठी सिनेसृष्टीला उभारी नक्कीच मिळाली. अनेक चित्रपट निर्माण नक्कीच झाले. काही चित्रपट तर उत्कृष्ट दर्जाचे होते. पण जागतिक सिनेमा पाहिला तर ते तग धरू शकणारे नव्हते.
एकदा सचिन पिळगावकर यांनी अभिमानाने म्हटलं होतं की ’मराठीत स्टार्स नाहीत, आर्टिस्ट आहेत.’ त्यावेळी हे वाक्य अभिमानास्पद वाटलं होतं. मात्र आता राज ठाकरेंनी ’मराठी स्टार्स नाहीत.’ अशी खंत व्यक्त केली, जे दुर्दैवी असलं तरी वास्तववादी वक्तव्य आहे. मराठीत आपण स्टार निर्माण करु शकलो नाही. या सर्व गोष्टीचं कारण असं आहे की मराठी माणसाचा न्यूनगंड मराठी सिनेसृष्टीत उतरला, दुसरी गोष्ट डाव्या लोकांनी केलेलं अतिक्रमण आणि प्रेक्षकांच्या रुचीचा अभाव व सिनेमा माफियागिरी.
डाव्या लोकांनी इतकं अतिक्रमण केलं आहे आणि स्वतःचीच माणसं घुसवून ठेवली आहेत, जी नाविन्यता देऊ शकत नाहीत. आपण काहीतरी नवीन करु शकतो हा आत्मविश्वास नसल्याने न्यूनगंड निर्माण झाला आहे आणि ज्याप्रमाणे दक्षिण भारतीय सिनेमा हा मातीतला असतो, त्याप्रमाणे मराठी सिनेमा हा मातीतला नसल्यामुळे त्यांना प्रेक्षकांची रुची माहित नाही, असेच म्हणावे लागेल. मातीतला सिनेमा म्हणजे थिल्लर आणि फालतू विनोद किंवा शेतकरी आत्महत्या व तेच ते रडगाणे, सिनेमा माफिया म्हणजे एखाद्या दिग्दर्शकाचेच सारखे सारखे चित्रपट येणे. एक दिग्दर्शक हिट झाला की तो कोणत्याही किंमतीत, कसाही सिनेमा बनवू लागतो. त्याचीच टीम घेऊन, तेच लोक घेऊन सिनेमा बनवल्यामुळे यात माफियागिरी घुसवली जाते आणि चित्रपट निर्मिती ही कला न राहता स्वतःचं पोट भरणारा केवळ धंदा होऊन जातो.
या अशा अनेक कारणांमुळे मराठी चित्रपट (marathi film) मागे पडत गेले. तर आमचा हा लेख (An Insight into the Making of Marathi Films) “मराठी चित्रपट निर्मितीची दुर्दशा; आपण इतके मागे का पडलो?” आवडला असेल तर नक्की शेअर करा.
 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.