शुद्धी चळवळ एक शस्त्र

    175

    स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी शुद्धी चळवळीवर जोर दिला होता. मुसलमान आणि ख्रिश्चन धर्मातील धर्मप्रचारक आणि धर्मप्रसारक हिंदूंचे मोठ्या प्रमाणावर धर्मांतर करून हिंदूंचे संख्याबळ रोडावण्याचा प्रयत्न करत होते. स्वतःचे संख्याबळ वाढवणे आणि संपूर्ण जग इस्लाममय आणि ख्रिस्तमय करण्याचा प्रयत्न करण्यासाठी हिंदूंचे धर्मांतर करण्यात येते. त्यांच्या या कुकृत्याला शह देण्यासाठी सावरकरांनी शुद्धी चळवळ आरंभली. ही शुद्धी चळवळ म्हणजे हिंदूंचे संख्याबळ अबाधित ठेवण्यासाठी उपयोगात आणलेले एक मोठे शस्त्र आहे. स्वामी श्रद्धानंदांनी याच शस्त्राचा उपयोग करून हिंदूंचे संख्याबळ घटणार नाही याची काळजी घेतली. त्याचाच परिणाम म्हणून त्यांची हत्या करण्यात आली.

    मुसलमानांनी आणि ख्रिश्चनांनी हिंदूंना फसवून, लालूच दाखवून, प्रसंगी बळाचा आणि छळाचा वापर करून हिंदूंना धर्मांतरित केले. जगाच्या दृष्टीने मुसलमानांचे आणि ख्रिश्चनांचे हे कुकृत्य न्याय्य ठरवण्यात आले. हिंदूंनी धर्मांतरित झालेल्या आपल्या बांधवांना पुनश्च शुद्ध करून स्वतःच्या धर्मात घेतले तर मात्र तो अपराध ठरतो. असा उफराठा न्याय आज जगात प्रतिष्ठा पावला आहे.‌

    थोडक्यात सर्व बाजूंनी हिंदूंना वेठीला धरायचे, त्यांच्यावर अन्याय करायचा, त्यांच्या श्रद्धास्थानांवर आघात करायचा आणि त्यांनी त्याला विरोध करून स्वतःचा बचाव करण्यासाठी प्रयत्न केला तर हिंदू असहिष्णू असल्याची बोंबाबोंब करायची. तोच न्याय म्हणून निकाल द्यायचा. हे हिंदूंना नष्ट करण्याचे षडयंत्र आहे हे धडधडीत दिसत असताना सुद्धा आपल्याच देशातले आपलेच हिंदुबांधव आपल्या वरतीच उलटतात ही खरी शोकांतिका आहे.

    २४ डिसेंबर २०२२ या दिवशी उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यातल्या छिवाला गावात ख्रिश्चनांनी ३५ हिंदूंचे धर्मांतर घडवून आणले. त्यासाठी एक प्रार्थना सभा आयोजित करण्यात आली. या प्रार्थना सभेला मसूरी येथील चर्चचे पादरी जेजारस कोर्निलियस आणि त्यांची पत्नी पुष्पा कोर्निलियस यांना आमंत्रित करण्यात आले. हे दाम्पत्य गेली अनेक वर्षे धर्मांतराचे काम करते. त्यांच्या विरोधात पोलिसांकडे गाऱ्हाणे नोंदवण्यात आले.‌ पोलीस आता त्यांचा तपास करत आहेत. अशा प्रार्थना सभा आयोजित करून आजूबाजूच्या गावातील हिंदू धर्मियांना या प्रार्थना सभेत पाचारण करण्यात येते. विविध प्रकारची प्रलोभने दाखवून त्यांना ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास प्रवृत्त केले जाते.‌ उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी पोलीस महानिर्देशक यांना याबाबतीत लक्ष घालण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर या घटनांकडे गांभीर्याने बघा असेही मुख्यमंत्र्यांच्या वतीने सांगण्यात आले.

    देशभरात अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या घटना सातत्याने घडत आहेत. हिंदूंच्या धर्मांतरांच्या या घटनांना आळा घालण्यासाठी बागेश्वरधामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी धर्मांतरित झालेल्या आपल्या बांधवांना पुनश्च स्वधर्मात शुद्ध करून घेतल्याचे कळताच हिंदूंच्या विरोधात षडयंत्र आखणाऱ्या सर्व लोकांचा जळफळाट झाला. त्यांच्यावर आकाश कोसळले. मुसलमान आणि ख्रिश्चन हे दोन्ही धर्म एकाच वेळी धोक्यात आले.‌ सहिष्णुता मृत झाली. घटनेला तिलांजली दिली.‌ असे भास सर्वांना होऊ लागले. कारण हिंदू सजग झाला आहे. तो आता अन्याय सहन करत नाही. हिंदू मधली प्रतिकारशक्ती कार्यरत झाली. याचाच आता सर्वांना त्रास होत आहे. कारण हिंदुस्तानचे इस्लामी राष्ट्रात आणि ख्रिश्चन राष्ट्रात परिवर्तन घडवून आणण्याचे स्वप्न धुळीला मिळाले आहे.

    ख्रिश्चन आणि मुसलमान यांच्या श्रध्दास्थानांवर आघात केला तर ती ईशानिंदा ठरते. त्यासाठी मृत्युदंड ही एकमेव शिक्षा. पण हिंदूंच्या श्रद्धास्थानांवरती आघात केल्यावर मात्र ती वैज्ञानिक दृष्टी ठरते ती ईशानिंदा ठरत नाही. असे घोषित करणाऱ्यांना हिंदूंकडून चोख उत्तर देण्यात येत असल्यामुळे या देशातील ख्रिश्चन आणि मुसलमान घाबरलेले आहेत अशी आवयी उठवली जाते. ते सत्य आहे कारण त्यांच्या हिंदू धर्म नष्ट करण्याच्या कार्यात मोठा अडथळा निर्माण झाला आहे.‌ त्यांचे ध्येय आता त्यांना गाठता येणार नाही याचेच त्यांना भय वाटते. म्हणूनच पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांना विरोध करण्याचा घाट घातला जात आहे. असा निष्कर्ष कोणी काढला तर त्यात चूक नाही.

    (लेखक व्याख्याते आहेत.)

    Join Our WhatsApp Community
    Get The Latest News!
    Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.