एकमेकांशी संपर्क साधायचा झाला तर आपण आता लगेच फोन किंवा मेसेज करून संबंधिताशी किंवा आपल्या नातेवाईकांशी संपर्क साधतो. परंतु तंत्रज्ञान प्रगत होण्याआधी केवळ पत्रव्यवहार, तार सेवा याद्वारे संपर्क साधला जायचा. एकेकाळी तार सेवा ही देशातील सर्वात जलद सेवा म्हणून ओळखली जात होती. नातेवाईकांचे सुख-दु:ख देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणारी तार सेवा १५ जुलै २०१३ पासून बंद करण्यात आली. या तारपर्वाविषयी जाणून घेऊया…
( हेही वाचा : दुसरे महायुद्ध, मुंबईचा डबेवाला ते ऑनलाइन ऑर्डर; Food वितरण प्रणालीचा रंजक इतिहास )
‘तार’पर्वाला सुरूवात
६ जानेवारी १८३८ मध्ये पहिला टेलिग्राम म्हणजेच तार पाठवली गेली, तर भारतात पहिली तार सन १८५० मध्ये हुगळी नदीच्या काठावर कोलकाता ते डायमंड हार्बर ही साडेतीन मैलांची पहिली केबल टाकली गेली आणि देशातील ‘तार’पर्वाला सुरूवात झाली. कोलकाता ते पेशावर, आग्रा, मुंबई, चेन्नई, बंगळुरू या शहरांना जोडणारे सुमारे चार हजार मैल लांबीचे टेलिग्राफ लाऊनचे जाळे उभारण्यास १८५३ मध्ये सुरूवात झाली. सुरूवातीची ४ वर्ष फक्त कंपनीच्या कामापुरुती मर्यादित असलेली तारयंत्रणा १८५४ मध्ये सर्व जनतेसाठी खुली करण्यात आली. एखादी महत्त्वाची बातमी तातडीने पोहोचवण्यासाठी तार सेवेचा वापर केला जात असे.
नव्या पिढीला माहित नसलेल्या तार सेवेने जुन्या पिढीचे भावविश्व व्यापले आहे. पूर्वीच्या काळी तारवाला मृत्यू, अपघात आणि गंभीर आजारपणाच्या तर काहीवेळी शुभवार्तेच्या बातम्या सुद्धा घेऊन येत असे त्यामुळे तारवाल्याच्या आगमनाकडे अनेक लोक डोळे लावून बसायचे. तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे १६३ वर्षांची तारसेवा २०१३ मध्ये बंद झाली. अखेरची तार पाठविण्यासाठी देशातील विविध तार केंद्रांवर प्रचंड गर्दी झाली होती.
तार सेवा कायमची बंद करण्याचा निर्णय
सन १९०३ मध्ये पहिल्या महायुद्धादरम्यान पहिले लढाऊ विमान उडाल्याची माहिती ही तारेनेच देण्यात आली होती. तर दुसऱ्या महायुद्धापासून तारवाला म्हणजे मृत्यूचा संदेश देणारा दूतच ठरला. या महायुद्धाच्या दरम्यान ज्या सैनिकांनी प्राण गमावले त्यांच्या कुटुंबीयांना ही माहिती तारेमार्फतच कळवली गेली. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी १९४७ मध्ये ब्रिटीश पंतप्रधान क्लेमेंट अॅटली यांना काश्मीरप्रश्नाच्या संदर्भात तार पाठवली, यात त्यांनी १६३ शब्दात कॉंग्रेसची भूमिका मांडली होती. भारत स्वतंत्र झाल्यावर हिंदीमधून तार पाठवण्याची सुविधा आली. ९० च्या दशकापर्यंत तारसेवा लोकप्रिय होती मात्र, कालांतराने जागतिकीकरणामुळे विज्ञानपर्व सुरू होऊन मोबाईल, इंटरनेटचा फटका टपाल खात्यामधील पत्रव्यवहार आणि तार सेवेला बसला. महिन्यातून केवळ एखादी व्यक्ती तार पाठवयाची, म्हणूनच सरकारने तार सेवा कायमची बंद करण्याचा निर्णय घेतला.
Join Our WhatsApp Community