Raksha Bandhan 2022: जाणून घ्या, रक्षाबंधन सणाचा इतिहास आणि महत्त्व

122

श्रावण पौर्णिमेला येणाऱ्या रक्षाबंधन या सणाच्या दिवशी बहीण आपल्या भावाचे औक्षण करून त्याला प्रेमाचे प्रतीक म्हणून राखी बांधते. भाऊ आपल्या बहिणीला ओवाळणी म्हणून भेटवस्तू देऊन तिला आशीर्वाद देतो. सहस्रो वर्षांपासून चालत आलेल्या रक्षाबंधन या सणामागील इतिहास, शास्त्र आणि या सणाचे महत्त्व तुम्हाला माहिती आहे का…

काय आहे रक्षाबंधनचा इतिहास

पाताळातल्या बळीराजाच्या हाताला लक्ष्मीने राखी बांधून त्याला आपला भाऊ केले व नारायणाची मुक्तता केली. तो दिवस श्रावण पौर्णिमेचा होता. ‘बारा वर्षे इंद्र आणि दैत्य यांच्यात युद्ध चालले. आपली 12 वर्षे म्हणजे त्यांचे 12 दिवस. इंद्र थकून गेला होता आणि दैत्य वरचढ होत होते. इंद्र त्या युद्धातून स्वतःचे प्राण वाचवून पळून जाण्याच्या सिद्धतेत होता. इंद्राची ही व्यथा ऐकून इंद्राणी गुरूंना शरण गेली. गुरु बृहस्पति ध्यान लावून इंद्राणीला म्हणाले, ‘‘जर तू आपल्या पातिव्रत्य बळाचा उपयोग करून हा संकल्प केलास की, माझे पतीदेव सुरक्षित रहावेत आणि इंद्राच्या उजव्या मनगटावर एक धागा बांधलास, तर इंद्र युद्ध जिंकेल.’’ इंद्र विजयी झाला आणि इंद्राणीचा संकल्प साकार झाला. तर भविष्यपुराणात सांगितल्याप्रमाणे रक्षाबंधन हे मूळचे राजांसाठी होते. मात्र राखीची एक नवी पद्धत इतिहासकाळापासून सुरू झाली आहे.

भावनिक महत्त्व

राखी बहिणीने भावाच्या हाताला बांधायची असते आणि त्यामागे भावाचा उत्कर्ष व्हावा व भावाने बहिणीचे संरक्षण करावे, ही भूमिका असते. बहिणीने भावाला राखी बांधण्याहून जास्त महत्त्वाचे आहे की, एखाद्या तरुणाने / पुरुषाने एखाद्या तरुणीकडून / स्त्रीकडून राखी बांधून घेणे. त्यामुळे त्यांचा, विशेषतः तरुणांचा व पुरुषांचा तरुणीकडे किंवा स्त्रीकडे पहाण्याचा दृष्टीकोन बदलतो.

राखी बांधतांना हा म्हणा मंत्र

येन बद्धो बली राजा दानवेन्द्रो महाबलः ।

तेन त्वामपि बध्नामि रक्षे मा चल मा चल ।।

अर्थ : महाबली आणि दानवेन्द्र असा जो बलीराजा जिने बद्ध झाला, त्या रक्षेने मी तुलाही बांधते. हे राखी, तू चलित होऊ नकोस.

राखी का बांधली जाते

बहीण आणि भाऊ यांचा एकमेकांत साधारण 30% देवाण-घेवाण हिशोब असतो. देवाण-घेवाण हिशोब राखी पौर्णिमेसारख्या सणांच्या माध्यमातून कमी होतो, म्हणजे ते स्थुलातून एकमेकांच्या बंधनात अडकतात; पण सूक्ष्म-रूपाने एकमेकांत असणारा देवाण-घेवाण हिशोब संपवत असतात. प्रत्येक वर्षाला बहीण आणि भाऊ यांच्या भावाच्या आधारे त्यांचे देवाण-घेवाण हिशोब कमी होत असल्याचे प्रतीक म्हणून राखी बांधली जाते. बहीण आणि भाऊ यांना स्वतःतील देवाण-घेवाण हिशोब न्यून करण्यासाठी ही एक संधी असल्याने या संधीचा दोन्ही जिवांनी लाभ करून घेतला पाहिजे.

बहिणीने भावाला राखी बांधतांना कसा भाव ठेवावा ? 

श्रीकृष्णाच्या बोटातून वाहणाऱ्या रक्तप्रवाहाला थांबवण्यासाठी द्रौपदीने तिच्या साडीचा पदर फाडून त्याच्या बोटाला बांधला. बहीण भावाला होणारा त्रास कदापी सहन करू शकत नाही. त्याच्यावर आलेले संकट दूर करण्यासाठी ती काहीही करू शकते. राखी पौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक बहिणीने भावाला राखी बांधतांना हाच भाव ठेवला पाहिजे.

कोणतीही अपेक्षा न करता राखी बांधण्याचे महत्त्व

रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीने भावाकडून वस्तूच्या रूपात कोणतीही अपेक्षा मनात बाळगल्यास ती त्या दिवशी मिळणाऱ्या आध्यात्मिक लाभापासून वंचित राहते. हा दिवस आध्यात्मिकदृष्ट्या देवाण-घेवाण हिशोब न्यून करण्यासाठी असतो. अपेक्षा ठेवून वस्तूची प्राप्ती केल्यास देवाण-घेवाण हिशोब 3 पटीने वाढतात.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.