लोकांच्या समस्या दूर करणारे बागेश्वर धामचे धिरेंद्र शास्त्री आहेत तरी कोण?

204

बागेश्वर धामचे धिरेंद्र शास्त्री यांच्यावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीची नजर पडल्यावर ते सध्या चर्चेत आले आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक यांनी त्यांच्याद्वारे ठेवलेल्या १० वस्तूंची अचूक माहिती देण्याचे आव्हान धिरेंद्र शास्त्रींना दिले आहे आणि यात यश आल्यावर ३० लाख रुपये देण्यात येतील असेही सांगितले आहे. शास्त्री यांनी हे आव्हान स्वीकारले आहे.

( हेही वाचा : ‘आजवर उद्धव ठाकरेंनी कोणत्याही नेत्याला मोठे होऊ दिले नाही, संजय कदमांची ही राजकीय आत्महत्या’)

अंधश्रद्धा निर्मूलन समितीने शास्त्री यांच्यावर जादू टोणा आणि अंधश्रद्धेचा आरोप केला आहे. धर्माच्या नावावर ते लोकांची फसवणूक करत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यास उत्तर देताना धिरेंद्र शास्त्री म्हणाले की, आपण संविधानानुसार धर्म प्रचार-प्रसार करत आहोत. हनुमानाची भक्ती करणे हा गुन्हा असेल तर सर्व हनुमान भक्तांवर एफआयआर दाखल करावा लागेल.

या वादानंतर धिरेंद्र शास्त्री यांची खूप चर्चा होत आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समिती व श्याम मानव यांना एक २६ – २७ वर्षांचा मुलगा जड जातोय असा संदेश लोकांमध्ये पसरत आहे. धिरेंद्र शास्त्री हे मध्य प्रदेशच्या बागेश्वरधामचे पीठाधीश आहेत. त्यांच्या भक्तांनुसार शास्त्रीजींवर भगवान हनुमंताची कृपा आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की दिव्य दरबारात हनुमान आणि दिव्य शक्तिंद्वारे ते चमत्कार करतात. बागेश्वरधाममध्ये देश विदेशातून लोक येतात. इथे बालाजीचे मंदिर आहे. मंदिराच्या मागे धिरेंद्र शास्त्री यांचे आजोबा सेतुलाल गर्ग बाबा यांची समाधी आहे.

या मंदिराला बागेश्वर धाम म्हटले आहे व याच नावाने हे मंदिर प्रसिद्ध आहे. लोक इथे आपली समस्या घेऊन येतात आणि धिरेंद्र बाबा त्यांची समस्या दूर करतात असं भक्तांचं म्हणणं आहे. धिरेंद्र बाबा हे अतिशय तरुण आहेत. २६ – २७ वर्षांचा या तरुणाला अनेक लोक शरण येतात. त्यांच्या वडिलांचे नाव पंडित श्री. रामकृपाल गर्ग आणि आईचे नाव श्रीमती सरोज असे आहे. त्यांचा जन्म १५ जुलै १९९६ रोजी मध्य प्रदेशच्या छतरपूर येथे झाला. त्यांचं बालपण अतिशय गरीबीत गेलं. कच्च्या घरात त्यांचं सबंध कुटुंब राहत होतं.

त्यांचं प्राथमिक शिक्षण गावातल्या सरकारी शाळेत झालं. ते लहानपणापासून खूप हुशार होते असं म्हणतात. त्यांचे वडिल आणि काका व इतर सदस्य पौरोहित्य करायचे. त्यांची आर्थिक परिस्थिती वाईट होती. त्यांच्या मातोश्री दूध विकण्याचा व्यवसाय करुन कुटुंबाची आर्थिक जबाबदारी सांभाळायच्या. धिरेंद्र लहानपणापासून चुणचुणीत होते. लोकांना आकर्षित करण्याची अद्भूत कला त्यांना अवगत होती.

वयाच्या ८ व्या वर्षांपासून ते बागेश्वरधामच्या सेवा कार्यात उतरले. किशोरवयात त्यांना असे काही अनुभव आले की ज्यावरुन वाटू लागलं की बागेश्वर बालाजीची त्यांच्यावर विशेष कृपा आहे. त्यानंतर १३ व्या वर्षी त्यांनी पहिल्यांदाच देवाची कथा ऐकायला सुरुवात केली. त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आणि ते प्रसिद्ध झाले. मग त्यांनी इतर ठिकाणी जाऊन श्रीरामाची कथा सांगायला सुरुवात केली. नागपूरमध्ये त्यांनी आपला दरबार भरवला होता तेव्हा देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी असे मोठे नेते उपस्थित होते.

आज त्यांच्यावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीची करडी नजर पडली आहे. परंतु ख्रिस्ती मिशनर्‍यांनी अनेक वर्षांपासून अंधश्रद्धा पसरवत धर्मांतरे घडवून आणली आहेत, त्याकडे मात्र श्याम मानव आणि त्यांच्या समितीने कानाडोळा केला आहे, त्यामुळे सामान्य जनतेला अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही हिंदूश्रद्धा निर्मुलन समती असल्याचा साक्षात्कार होतो व ते ढोंगी असल्याची चर्चा देखील सोशल मीडियावर व इतर मंचावर होत राहते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.