एका कुटुंबातील किती महिलांना मिळणार Ladki Bahin Yojana चा लाभ; वाचा काय आहेत निकष…

Ladki Bahin Yojana : एकाच कुटुंबात दोन महिलांना संधी मिळणार असल्याचे या वेळी देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) जाहीर केले. २१ वर्षांपासून ६५ वर्षांपर्यंत ज्या महिलांचे उत्पन्न अडीच लाखाच्या आत आहे, त्यांना १५०० रुपये प्रतिमहिना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

213
एका कुटुंबातील किती महिलांना मिळणार Ladki Bahin Yojana चा लाभ; वाचा काय आहेत निकष...
एका कुटुंबातील किती महिलांना मिळणार Ladki Bahin Yojana चा लाभ; वाचा काय आहेत निकष...

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना घोषित केली. मात्र त्यात अनेक शंका असल्याचे समोर आल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत त्यासंदर्भात निवेदन केले. आलेल्या शंकांमध्ये प्रामुख्याने अर्ज करण्यासाठीची अल्प मुदत आणि एक कुटुंबातील किती महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात, हा महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून हे बदल करण्यात आल्याचा दावाही करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सोमवार, ३ जुलै रोजी याबाबत नव्याने निर्णय घेऊन घोषणेच्या तरतुदींमध्ये काही बदल केले आहेत. (Ladki Bahin Yojana)

(हेही वाचा – Fraudulent YouTuber : विमानतळावरील शोरुममधून ‘हा’ युट्यूबर करत होता सोन्याची तस्करी)

किती महिलांना मिळणार लाभ

एकाच कुटुंबात दोन महिलांना संधी मिळणार असल्याचे या वेळी देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) जाहीर केले. या योजनेचा गैरवापर होऊ नये; म्हणून एका कुटुंबात दोन महिलांना याचा फायदा देण्याचा निर्णय झाला आहे. एक विवाहित असेल, तर एका अविवाहित महिलेलाही या योजनेचा फायदा देण्याचा निर्णय झाला आहे.

अर्ज करण्यासाठी किती दिवस मिळणार ?

माझी लाडकी बहीण ही महत्त्वाकांक्षी योजना राज्य सरकारने घोषित केली आहे. काल त्यात काही बदल करण्यात आले आहेत. २१ वर्षांपासून ६५ वर्षांपर्यंत ज्या महिलांचे उत्पन्न अडीच लाखाच्या आत आहे, त्यांना १५०० रुपये प्रतिमहिना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेतील लाभार्थ्यांसाठीच्या पात्रता निकषांमध्ये टाकलेली पाच एकरची अट आता काढण्यात आली आहे. १५ दिवसांऐवजी अर्ज करण्यासाठी ६० दिवस दिले आहेत. या काळात जे अर्ज करतील, त्यांनी १ जुलैला अर्ज केला आहे, असे गृहीत धरून पैसे दिले जातील. ऑगस्टमध्ये जे अर्ज करतील, त्यांना अर्ज करतील त्या तारखेपासूनचे पैसे मिळतील, असे देवेंद्र फडणवीस या वेळी म्हणाले आहेत.

डोमिसाईल दाखल्याला अनेक पर्याय

डोमिसाईलचा दाखला हा प्रश्न निर्माण झाला होता. त्याला पर्याय देण्यात आला आहे. नवऱ्याचा जन्म राज्यात असेल, त्याचं जन्माचं प्रमाणपत्र चालेल. रेशनिंग कार्ड १५ वर्षांचं असेल, तर ते चालेल. मतदारयादीतलं नाव असेल, तर तेही चालेल. असे अनेक पर्याय दिले आहेत. उत्पन्नाच्या दाखल्याचीही मर्यादा काढून टाकण्यात आली आहे. केशरी कार्ड आणि पिवळ्या कार्डमध्ये राज्यातले साडेसात कोटी लोक कव्हर होतात. त्यांच्यासाठी आता उत्पन्नाच्या दाखल्याची अट काढून टाकण्यात आली आहे. त्या रेशनिंग कार्डवरच त्यांना योजना मिळणार आहे.

एजंटच्या नादी लागू नका

“मी सर्व भगिनींना विनंती करतो की, कुणीही एजंटच्या नादी लागू नका. कुणी एजंट येत असेल, तर तक्रार करा. अमरावतीमध्ये एका सरकारी कर्मचाऱ्याने गडबड करण्याचा प्रयत्न केला. काल त्याला नोकरीतून निलंबित केले. त्याला बडतर्फ करण्याचाही विचार सरकार करत आहे. त्याशिवाय सेतू केंद्र किंवा अंगणवाडी सेविकांनी या योजनेत मदत करावी; म्हणून प्रती फॉर्म ५० रुपये राज्य सरकार त्यांना देणार आहे. यावर जर कुठला सेतूकेंद्र चालक पैसे घेत असेल आणि त्याचा पुरावा समोर येईल, त्या सेतू केंद्र चालकाचा परवानाही रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. याचे आदेश काढले आहेत. या सगळ्या गोष्टी शक्य तितक्या ऑनलाईन करण्याचा आपला प्रयत्न आहे. यामुळे जास्त वेगाने पैसे देता येतील. सुरुवातीच्या काळात एकाच वेळी जास्त लोक तिथे अर्ज दाखल करण्यासाठी येतात. त्यामुळे सर्व्हर स्लो झाल्याचं पाहायला मिळतंय. पण आता त्याही अडचणी काढल्या आहेत. त्यामुळे ऑगस्ट महिन्यापासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात जातील”, असे ते म्हणाले. (Ladki Bahin Yojana)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.