धक्कादायक…२०० हून अधिक जिवंत बॉम्ब सापडले!

124

पश्चिम बंगाल हे राज्य कायम संवेदनशील समजले जाते, मग ते दंगली असो, गुन्हेगारी असो किंवा दहशतवाद असो, हे राज्य कायम धगधगत असते. या राज्यातील ही परिस्थिती किती वाईट आहे, याचा प्रत्येय आला आहे. या राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी २०० हून अधिक जिवंत बॉम्ब सापडले आहेत. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये गल्लोगल्ली बॉम्बची निर्मिती होते का, अशी चर्चा आता सुरु झाली आहे.

शेत जमिनींमध्ये पुरून ठेवलेले बॉम्ब 

बीरभूममध्ये झालेल्या हिंसाचाराचा तपास सध्या सीबीआय ही केंद्रीय तपास यंत्रणा करत आहे. यादरम्यान गेल्या दोन दिवसांत राज्यात विविध भागात 200 हून अधिक जिवंत बॉम्ब सापडले आहेत. राज्यात सातत्याने बॉम्ब सापडत असल्याच्या तक्रारींनंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या आदेशानुसार पोलिसांकडून मोठ्या प्रमाणावर छापेमारी सुरू झाली. यानंतर मुर्शिदाबादमधील दोन परिसरातून 41 जिवंत बॉम्ब, शस्त्रे आणि दारुगोळा जप्त करण्यात आला. रविवारी सकाळी रेजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका शेतजमिनीतून पोलिसांना तीन ड्रम भरुन बॉम्ब सापडले. पोलिसांनी आता संपूर्ण परिसराला वेढा घातला असून बॉम्ब शोधक पथकालाही माहिती देण्यात आली आहे. रेजीनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन ड्रममध्ये 31 जिवंत बॉम्ब सापडले आहेत. बॉम्बशोधक पथकाने घटनास्थळी पोहोचून ते बॉम्ब निकामी केले. तर शहरातील राणीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्येही एका शेतातूनही दहा जिवंत बॉम्ब जप्त केले. या बॉम्बसोबत एक शटर पाइपगन आणि चार काडतुसेही जप्त करण्यात आली.

(हेही वाचा उत्तर प्रदेश कोणी जिंकवले, मोदींनी की योगींनी? गडकरी काय म्हणतात…)

सीबीआयच्या कारवाईमुळे पोलीस अलर्ट 

शस्त्रास्त्र कायद्याप्रकरणी पोलिसांनी प्रताप मंडल नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. एका दिवसापूर्वीच पश्चिम बंगालच्या बीरभूम जिल्ह्यातील रामपुरहाटमध्ये 40 देशी बनावटीचे बॉम्ब सापडले होते. शुक्रवारपासून बीरभूममधून एकूण 170 देशी बनावटीचे बॉम्ब सापडले आहेत. रामपूरहाटच्या बोगतुई गावाला लागून असलेल्या मारग्राममधील एका बांधकामाधीन इमारतीतून पोलिसांनी क्रूड बॉम्बने भरलेल्या आणखी 4 बादल्या जप्त केल्या, ज्यात सुमारे 40 बॉम्ब होते. शुक्रवारी मरग्राममधूनच 5 बादल्या क्रूड बॉम्ब जप्त करण्यात आले होते. बीरभूम जिल्ह्यातील रामपुरहाटमध्ये टीएमसी नेत्याच्या हत्येनंतर हिंसाचार उसळला होता. येथे अनेक घरांना आग लागली. या आगीत 2 मुलांसह 8 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये 3 महिलांचाही समावेश होता. आता याप्रकरणी सीबीआय कारवाई करत आहे. यामुळे पोलीस अलर्ट झाले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.