पोलिसांच्या संरक्षणामध्ये ही गुंडशाही सुरु, भाजप जशास तसे उत्तर देणार; फडणवीसांचे मविआवर टीकास्त्र

96

गेले दोन दिवस राज्यात कायदा-सुव्यवस्थेची दुरावस्था झाल्याचे पहायला मिळत आहे. राणा दाम्पत्याविरुद्ध शिवसैनिकांनी घेतलेला आक्रमक पवित्रा, शुक्रवारी रात्री भाजप नेते मोहित कंबोज यांच्या गाडीवर झालेला हल्ला. या घटना ताज्या असतानाच आता शिवसेनेवर वारंवार टीका करणाऱ्या भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर शिवसैनिकांकडून शनिवारी रात्री हल्ला केला. या हल्ल्यानंतर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली आहे.

पोलिसांच्या संरक्षणामध्ये ही गुंडशाही सुरु असून, लोकशाही पायदळी तुडवली जात आहेत. याला भाजप जशास तसे उत्तर देणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. रविवारी आपण गृहसचिवांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

( हेही वाचा: सोमय्यांच्या गाडीवर शिवसैनिकांचा हल्ला, सोमय्यांची आक्रमक प्रतिक्रिया )

हे तत्काळ बंद झाले नाही तर… फडणवीसांचा इशारा

आपल्यावर हल्ला होणार याची माहिती आधीच किरीट सोमय्या यांनी पोलिसांना दिली होती. त्यावर कोणतीही कारवाई पोलिसांनी केली नाही. पोलिसांच्या संरक्षणामध्ये ही गुंडागर्दी सुरु असल्याचे फडणवीस म्हणाले. मुंबई पोलिसांची अब्रु या पोलिसांनी घालवली आहे. लोकशाही पायदळी तुडवली आहे. रात्रीच्या वेळी एका महिलेला पोलीस कस्टडीमध्ये ठेवता येत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. पण त्याचे उल्लंघन करुन नवनीत राणा यांना पोलीस स्टेशनमध्ये ठेवले गेले. राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यासारख्या वागणा-या पोलिसांवर कारवाई करा, अशी मागणी आपण करणार आहोत. पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की जशास तसे उत्तर देण्याची धमक आमच्यात आहे. हे तत्काळ बंद नाही झाले, तर आम्ही आक्रमक भूमिका घेणार, असे देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.