अडीच वर्षांनी वरळीकरांना लाभले आमदारांचे दर्शन

175

आजवर मंत्रीपदाची शाल अंगावर पांघरत फिरणाऱ्या वरळीतील आमदार आदित्य ठाकरे यांचे दर्शन विभागातील जनतेला दुर्लभ झाले होते. आमदार बनल्यानंतर मंत्रीपदाची माळ धारण करणाऱ्या आदित्य ठाकरेंचे विभागात दुर्लक्ष होत होते. माजी मंत्री व आमदार सचिन अहिर आणि आमदार सुनील शिंदे यांच्यावर विधानसभेची जबाबदारी सोपवून आदित्य ठाकरे हे मंत्रीपदाची जबाबदारी पार पाडत होते. परंतु आता मंत्रीपद जाताच तसेच शिवसेनेतील आमदार व खासदार फुटून जाताच आदित्य ठाकरेंना आता मतदारांची आठवण होऊ लागली असून सोमवारी आमदार निधीतून करण्यात येणाऱ्या पाच ते सहा इमारतींच्या दुरुस्तीच्या कामांचे भूमीपुजन केले. त्यामुळे अडीच वर्षांनी वरळीकरांना आपल्या आमदारांचे दर्शन घडल्याची प्रतिक्रीया ऐकायला मिळत आहे.

( हेही वाचा : वीर सावरकरांवरील टीका सहन करणार नाही – केसरकर)

मतदार संघात लक्ष घालण्यास सुरुवात

वरळीतील शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे यांचा पत्ता कापून या विधानसभा मतदार संघातून शिवसेना नेते व युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांना आमदारकीची तिकीट जाहीर करण्यात आली. आदित्य ठाकरे यांचा विजय सुकर व्हावा म्हणून राष्ट्रवादीचे माजी मुंबई अध्यक्ष व माजी आमदार सचिन अहिर यांना शिवसेनेत प्रवेश देण्यात आला आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांना निवडून आणण्यासाठी दोन माजी आमदारांची मदत घेण्यात आली आणि आमदार म्हणून निवडून आल्यानंतर मतदार संघाची जबाबदारी या दोन्ही माजी आमदारांवर सोपवण्यात आली.

सन २०१९मध्ये युतीचे उमेदवार म्हणून निवडून आल्यांनतर शिवसेनेने भाजपसोबत सरकार स्थापन करण्याऐवजी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेससोबत सरकार स्थापन केले. या महाविकास आघाडी सरकारमध्ये आदित्य ठाकरे यांच्यावर उपनगराचे पालकमंत्री तसेच पर्यावरण, पर्यटन आणि राजशिष्टाचार आदी खात्यांचे मंत्रीपद देण्यात आले. त्यामुळे आदित्य ठाकरे हे मंत्रीपद भूषवत असताना विधानसभा मतदार संघात सचिन अहिर आणि सुनील शिंदे हेच लक्ष देत होते. त्यामुळे आदित्य ठाकरे हे मतदार संघात फिरकत नव्हते. त्यामुळे विभागात आदित्य ठाकरे यांचे दर्शन होत नसल्याची नाराजी विभागात ऐकायला मिळत होत्या. त्यामुळे मागील अडीच वर्षांत जिथे विभागातील जनतेला न दिसणारे स्थानिक आमदार हे राज्यातील सरकार बरखास्त झाल्यानंतर आणि शिवसेनेतील आमदार व खासदार फुटून गेल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी आपल्या मतदार संघात लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे.

विविध उद्घाटनांचा सपाटा 

आदित्य ठाकरे यांनी सोमवारी वरळीतील शाखा क्रमांक १९८ व १९९ भागातील विविध उद्घटनांचा सपाटा लावला. यामध्ये इस्लामी बिल्डींग इमारत, हाजी कासम बिल्डींग, १०० मेहेर लॉज वाडी, ८६ जमशेद बिल्डींग, ४०४ बीबी महावीर प्रसाद चाळ , ४०४ ए कृष्णा बिल्डींग आदींची दुरुसती तसेच पृथ्वी वंदन सोसायटीचे पॅसेज व प्रवेशद्वार आदींची दुरुस्तीच्या कामांचे उद्घटन आदित्य ठाकरेंनी केले. मागील अडीच वर्षांत प्रथम अशाप्रकारच्या कामांसाठी आदित्य उपस्थित राहिल्याने विभागातील जनतेला आता आपले स्थानिक आमदार हे आदित्य ठाकरे हेच असल्याचे कळू लागले. यापूर्वी सचिन अहिर आणि सुनील शिंदे हेच मतदार संघ पाहता असल्याने यापूर्वी लोकांना हेच नेते आपल्या विभागाचे आमदार आहेत की काय असे वाटत होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.