‘महाज्योती’मध्ये मनमानी कारभार, विद्यार्थी हितासाठी संचालक तात्काळ बदला!

92
महाविकास आघाडी सरकारने ‘महाज्योती’ सारख्या अत्यंत महत्त्वाच्या संस्थेचा वापर स्वत:च्या फायद्यासाठी केला. त्यामुळे या संस्थेची प्रशासकीय यंत्रणा पूर्णतः ढासळली. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतरही महाविकास आघाडीच्या काळातील प्रशासकीय प्रथा तेथे कायम आहेत. त्यामुळे ‘महाज्योती’मध्ये मनमानी कारभार करणाऱ्या व्यवस्थापकीय संचालकांना तात्काळ बदलावे, अशी मागणी भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे केली आहे.
बहुजन, गोर गरीब विद्यार्थ्यांचा प्रशासनातील टक्का वाढावा, त्यांचा कौशल्य विकास व्हावा, बहुजन समाजातील विविध समस्यांचा धोरणात्मक अभ्यास व्हावा, या हेतून आपण मुख्यमंत्री असताना महात्मा ज्योतिबा फुले यांच्या नावाने ‘महाज्योती’ या संस्थेची स्थापना केली. परंतु स्थापनेनंतर काही महिन्यातच दगाबाजीने सत्तेत आलेल्या महाविकास आघाडी सरकारने ‘महाज्योती’ सारख्या अत्यंत महत्त्वाच्या संस्थेचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी केला. त्यामुळे संस्थेची प्रशासकीय यंत्रणा पूर्णतः ढासळली, असे पडळकर यांनी पत्रात नमूद केले आहे.
या विरोधात बहुजन विद्यार्थ्यांनी वारंवार आवाज उठवला. आपले सरकार सत्तेत आल्यानंतर तातडीने आपल्या मार्गदर्शनाखाली खात्याचे मंत्री अतुल सावे यांनी महाज्योती संस्थेचे अनेक रखडलेले निर्णय एका दिवासात मार्गी लावले आहेत. परंतु महाविकास आघाडीच्या कार्यकाळात स्थापित झालेल्या अनेक चुकीच्या प्रशासकीय प्रथा आजही कार्यरत आहेत, याकडे पडळकर यांनी लक्ष वेधले आहे.

मागणी काय? 

  •  स्पर्धा परिक्षेचे प्रशिक्षण कोणत्या संस्थेकडून घ्यायचे, याचे स्वातंत्र्य विद्यार्थ्यांना असले पाहिजे. परंतु कोणतेही स्पर्धात्मक खुले कंत्राट न मागवता, आघाडी सरकाच्या काळातील कंत्राटेच महाज्योतीच्या संचालकांकडून व प्रशासकीय यंत्रणेकडून पुढे रेटली जात आहेत.
  • महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक, खात्याचे सचिव यांच्या विरोधात माध्यमांत सातत्याने यासंदर्भात बातम्या येत आहेत. त्यामुळे विनाकारण शिंदे-फडणवीस सरकाच्या प्रतिमेला तडा जात आहे.
  • आपण महाज्योती संस्थेची स्थापना एका उद्दात्त हेतूने केली आहे. हा हेतू साध्य करण्यासाठी संस्थेतील व्यवस्थापकीय संचालक बदलून तिथे पूर्णवेळ व बहुजन विद्यार्थ्यांचे प्रश्न संवदेनशीलतेने हाताळण्याऱ्या अधिकाऱ्यास संधी द्यावी.
  • बहुजन विद्यार्थ्यांच्यादृष्टीने हे महत्वाचे पाऊल ठरेल, अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रातून केली आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.