अरविंद सावंतांनी नवनीत राणांना काय दिली धमकी? वाचा…

जेव्हा प्रसंग घडला तेव्हा नवनीत राणा यांच्या बाजूला अनेक जण होते, त्यांनी सांगावे मी धमकी दिली का?, असे शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत म्हणाले. 

102

संसदेत सोमवारी, २२ मार्च रोजी परम बीर सिंग हा मुद्दा चांगलाच गाजला, त्यावेळी अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. यावेळी सेनेचे खासदार अरविंद सावंत यांच्याशी बाचाबाची झाली, त्यात त्यांनी राणा यांना थेट धमकी दिली. त्यामुळे राणा यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना थेट पत्र लिहून सावंत यांच्या विरोधात तक्रार केली.

काय म्हटले आहे नवनीत राणांनी?

अरविंद सावंत यांनी आपल्याला ‘तू महाराष्ट्रात कशी फिरतेस ते मी बघतोच आणि तुलाही तुरुंगात टाकू’, अशी धमकी दिल्याचे खासदार नवनीत राणा यांनी त्यांच्या पत्रात म्हटले आहे. सावंत यांनी लोकसभेच्या लॉबीत आपल्याला ही धमकी दिली, असे म्हटले आहे.

काय म्हटले अरविंद सावंतांनी? 

जेव्हा प्रसंग घडला तेव्हा नवनीत राणा यांच्या बाजूला अनेक जण होते, त्यांनी सांगावे मी धमकी दिली का? नवनीत राणा यांची बोलण्याची पद्धत चुकीची होती.

(हेही वाचा : फडणवीसांचे ‘ते’ भाकीत खरे ठरणार का? )

लोकसभेत भाषण करताना काय म्हणाल्या नवनीत राणा? 

एक सहाय्यक पोलीस निरीक्षक जो १६ वर्षे निलंबित होता, ७ दिवस कारागृहात होता, त्याला पोलीस सेवेत पुन्हा सामावून घेण्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यावेळीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर दबाव टाकला होता, मात्र फडणवीस यांनी त्याला नकार दिला. त्यानंतर राज्यात ठाकरे सरकार आले आणि लगेचच सचिन वाझे याला त्यांनी सेवेत सामावून घेतले. त्याच्या माध्यमातून मुख्यमंत्री ठाकरे यांनी खंडणी वसुली सुरु केली, असा आरोप खासदार राणा यांनी लोकसभेत केला. जर अशा पद्धतीने खंडणी वसूल करण्याचे काम सुरु झाले, तर संपूर्ण देशात हा प्रकार होऊ शकतो. राज्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांच्या सांगण्यावरुनच हे सगळे सुरु आहे. बदल्या करणे, खंडणी वसूल करणे यामध्ये इतर कोणीही सहभागी नाही. एकट्या मुंबईतून महिन्याला १०० कोटी वसुली होत असेल, तर संपूर्ण महाराष्ट्रातून किती होत असेल?, अशी विचारणा खासदार राणा यांनी यावेळी केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.